मुंबई – सध्या महागाईचा दर उच्च पातळीवर असला तरी तो लवकरच 4 टक्के पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे.
काही वृत्त माध्यामांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने विकास दर वाढावा याकरीता प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे महागाई वाढली तरी व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. मात्र महगाई फार काळ सध्याच्या पातळीवर राहणार नाही. ती लवकरच 4 टक्के या पातळीवर येईल असल्याचे त्यांना वाटते. आगामी पतधोरणात या विषयावर विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. कारण जागतीक पातळीवर भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. या घटनाक्रमाकडे सरकारचे व रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या अगोदर दास यांनी निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याचे सांगितले होते.
जून अखेरच्या तिमाहीत बॅंकांची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 7.5 टक्के इतकी मोजली गेली आहे. ही परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. कर्ज वितरणासाठी बॅंकाकडे पुरेशी भांडवल सुलभता असल्याचे त्यांनी सागीतले.
क्रिप्टोकरन्सीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, याबाबत बॅंकेने आपली भूमिका सरकारकडे अनेक वेळा स्पष्ट केली आहे. अशा करन्सीची देशाला गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कोणाचा काहीही लाभ होणार नसल्याचे ते म्हणाले.
विकास दराबाबत बोलतांना ते म्हणाले की, विकास दर वाढावा याकरीता बॅंकेने आणि केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षीपासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला नाही. पहिल्या तिमाहीचा विकास दर 20.1 टक्के इतका मोजला गेला आहे. त्यामुळे उद्योग आणि सरकार आशावादी झाले आहे. आता पुढील तिमाहीतील विकास दर आणखी वाढणार आहे. त्यामुळे पुर्ण वर्षाचा विकास दर अपेक्षेप्रमाणे 10.5 टक्के होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.