नवी दिल्ली – देशातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जे आज लोकांना अर्धपोटी झोपायला भाग पाडत आहेत, ते स्वतः मात्र मित्रांच्या सावलीत निवांत झोपत आहेत. पण या अन्यायाच्या विरोधात आता देश एकवटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या गॅस दरवाढीच्या विरोधात त्यांनी इंडिया अगेंस्ट बीजेपी लूट असा हॅश टॅगही चालवला आहे.
ट्विटरवर त्यांनी ही पोस्ट टाकतानाच देशात गेल्या जानेवारी महिन्यापासून किती प्रमाणात गॅस दरवाढ झाली याची आकडेवारीही प्रकाशित केली आहे. देशात सतत गॅस सिलिंडरची दरवाढ होत आहे त्याबद्दल अन्यही राजकीय पक्षांकडून निषेध नोंदवला जात आहे.
कॉंग्रेस पक्षानेही या दरवाढीबद्दल मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पक्षाने म्हटले आहे की, मार्च 2014 मध्ये गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये होती, ती आज 884 रुपये झाली आहे. म्हणजेच मोदी सरकारच्या काळात गॅस सिलिंडरची दरवाढ तब्बल दुप्पटीहून अधिक झाली आहे. मोदींनी लोकांना हेच अच्छे दिन दाखवले आहेत अशी टीकाही कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.