पुणे – नवऱ्याने आणलेल्या पाणी-पुरीवरून भांडण झाल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 28 ऑगस्टला पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील सिंहगड व्हिलामध्ये घडली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतिक्षा सरवदे (वय 23, रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय 33) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ आणि प्रतिक्षा यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत होते. 28 ऑगस्टला गहिनीनाथने पत्नीला खाण्यासाठी पाणीपुरी आणली होती. मात्र, पत्नीने पाणीपुरी खाल्ली नाही.
त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. वादातून प्रतिक्षाने राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रतिक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.