नागपूर – कॉंग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केदार यांनी स्वत:च्या विरोधातील एका खटल्यात स्वत:च्याच मित्राची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे.
केदार हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आहेत. हा सन 2002 सालातील खटला असून हा खटला सतत लांबवण्याचा प्रयत्न केदार हे करीत असतात. आता या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना केदार यांनी स्वत:च्याच मित्राला या खटल्यात सरकारी वकील म्हणून नेमले आहे.
त्याने आपल्या विरोधात युक्तिवाद करू नये असा डाव या मागे आहे, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे. या वकिलांची या खटल्यातील नियुक्ती रद्द करावी आणि केदार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असा आरोपही त्यांनी केला आहे.