फुरसुंगी- हडपसर-सासवड पालखीमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला असतानाही या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वड, पिंपळाचे शेकडो वृक्ष तोडण्यात आले. परंतु, साधी डागडुजीही गेल्या पाच ते सात वर्षांपासून झालेली नाही.
हडपसर-सासवड मार्गावर सत्यपुरम, तुकाईदर्शन, भेकराईनगर चौक, विठ्ठल पेट्रोलियम, फुरसुंगी फाटा, रेल्वे उड्डाणपूल, मंतरवाडी चौक, उरूळी देवाची फाटा आदी ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. भीषण वाहतूक कोंडी, खड्डेच खड्डे, दगड-गोटे, चिखल, घाण पाणी, अरूंद रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सत्यपुरम ते उरुळी देवाची पोलीस चौकीदरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी कोठेही वाहिन्या नसल्याने पाणी रस्त्यावरच साचूत आहे. या मार्गावरील ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने मोऱ्या बंद झाल्या आहेत.
खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर कोठेही पदपथ नसल्याने पादचाऱ्यांना पायी चालणेही अवघड झाले आहे. राष्ट्रीय प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याच्या दुरवस्थेची कोणतीही दखल घेतली जात नाही. या भागाचे प्रतिनिधित्व करणारेही गप्प असल्याने वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांकडूनह नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.