नवी दिल्ली – उशिरा का होईना भारतामध्ये आता जीएसटी रुळू लागला आहे. मात्र सध्या जीएसटीचे पाच टप्पे आहेत हे टप्पे कालांतराने कमी करून 3 करण्याच्या शक्यतेवर विचार चालू आहे. मात्र एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातील निर्णय घ्यावे लागतील असे अर्थ मंत्रालयाचे सल्लागार के व्ही सुब्रमण्यन यांनी सांगितले.
असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना सुब्रमण्यन यांनी सांगितले की, जीएसटीचे टप्पे कमी करण्यावर सरकार गंभीरपणे विचार करीत असून लवकरच याबाबत जीएसटी परिषद विचार करण्याची शक्यता आहे. डझनभर अप्रत्यक्ष कर एकत्र करून जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली आहे.
सध्या जीएसटी मध्ये 0.25 टक्के, 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे पाच दर आहेत. जागतिक पातळीवर मात्र जीएसटी मध्ये केवळ तीन दर आहेत. भारतातील सध्याची परिस्थिती पाहता सध्या पाच दर ठेवण्यात आले आहेत. मात्र हळूहळू यामध्ये कपात करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य लोक ज्या वस्तूचा वापर करतात त्यांना जीएसटीच्या कार्यकक्षेत घेतलेले नाही. तर श्रीमंत लोक ज्या वस्तूंचा वापर करतात त्यावर सर्वात जास्त म्हणजे 28 टक्के इतका कर ठेवण्यात आला आहे. गेले आठ महिने जीएसटीचे संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते. मात्र जून महिन्यामध्ये बऱ्याच राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे जून महिन्यामध्ये कर संकलन एक लाख कोटीपेक्षा कमी झाले आहे.
मोठ्या बॅंकांची गरज
भारताची अर्थव्यवस्था वाढत असल्यामुळे आता भारताला मोठ्या बॅंकांची गरज निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या 100 बॅंकांमध्ये भारतातील केवळ स्टेट बॅंक आहे. स्टेट बॅंक या 100 बॅंकाच्या यादीत 55 क्रमांकावर आहेत. मात्र या 100 बॅंकांमध्ये चीनच्या 18 बॅंका आहेत तर अमेरिकेच्या 12 बॅंका आहेत. त्यामुळे भारताला आगामी काळामध्ये मोठ्या बॅंकांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यामुळे भारतातील आणि परदेशातील उद्योगांना भांडवल पुरवठा करणे सोपे जाईल.