हेराक्लिटस या ग्रीक तत्त्ववेत्त्यानं म्हटलेलं change is the only constant in life हे वाक्य नेहमी उद्धृत केलं जातं. ते खरंही आहे. दररोजचा दिवस काही सारखा नसतो. आपण अनुभवतो की नवा दिवस नवी आव्हानं घेऊन येतो. गेली दोन वर्षे तर आपण हे नित्यनियमानं अनुभवतो आहोत. करोनामुळे सगळं जीवनच बदलून गेलं आहे. रोज नवनवीन गोष्टी ऐकू येत आहेत, अनुभवाला येत आहेत. विषाणूंची नवीन रूपं-जी कधी माहीतही नव्हती ती समोर येत आहेत.
सारखी सारखी तीच कामं केल्यानं माणसाला कंटाळा येतो. माणसाला त्यामुळे कामात बदल हवा असतो. बऱ्याच कारखान्यांत अशा कंटाळलेल्या कामगारांना ब्रेक देण्यात येतो आणि या “ब्रेक टाइम’मध्ये कामगार बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळू शकतात आणि शरीर आणि मन ताजंतवानं करू शकतात. आयटी कंपन्यांत तर आणखी अनेक सुविधा असतात जेणेकरून तोचतोचपणावर तात्पुरती का होईना मात करता येते.
अशाच एका आयटी कंपनीतील एका सहकाऱ्यानं तेच डेस्क, तीच खुर्ची, तेच क्युबिकल अशा कंटाळवाण्या वातावरणात बदल करण्यासाठी एक नामी युक्ती शोधून काढली होती. तो रोज क्युबिकलच्या सॉफ्ट पार्टिशनवर वेगवेगळे फोटो किंवा चित्रं चिकटवायचा. कधी पत्नीचा किंवा मुलांचा फोटो तर कधी मुलीनं काढलेलं चित्र असं तो रोज त्याचं डेस्क सजवायचा. खुर्चीवरचं कव्हरही रोज वेगळ्या रंगाचं असायचं. याचा त्याला कितपत उपयोग झाला ते माहीत नाही, पण शेवटी त्यानं नोकरी सोडून दुसरी धरली तेव्हा मात्र त्याला कामात बदल मिळाला असेल असं वाटतं.
गृहिणींना तर स्वयंपाक-पाणी, घरातली नेहमीची कामं याचा खूप कंटाळा येतो. जेव्हा नोकरीतील आणि संसारातील रहाटगाडग्याचा कंटाळा येतो तेव्हा सहलीचा पर्याय निवडला जातो. सध्या करोनामुळे या पर्यायालाही मर्यादा आल्या आहेत. तेव्हा कामात बदल हाच विरंगुळा ठरू शकतो. म्हणजे माणसाला बदल हा केवळ हवाच असतो असं नाही तर तो अनिवार्य आहे.
काही व्यावसायिक अनेक वर्षे तीच तीच कामं केल्यामुळे मानसिक थकवा अनुभवतात आणि शेवटी चक्क व्यवसाय सोडून देतात (बहुतेक वेळा पुरेसा पैसा जमा झाल्यावर) आणि मनाला रुचेल असं काम स्वीकारतात-मग ते लाभदायक नसेना का. अशी माणसं म्हणतात आता बस्स झालं. कंटाळा आला. आता मला आवडतं ते मी करणार. कुणी चित्रं काढतं, कुणी संगीतामध्ये स्वत:ला बुडवून घेतं पण सरतेशेवटी मनाचा उल्हास आणि शांती यांचा लाभ ते घेतात. कधी कधी हा बदल जीवनाची वाटच बदलून टाकतो.
विख्यात विज्ञानकथालेखक आर्थर सी. क्लार्क यांना पाश्चिमात्य जीवनपद्धतीचा उबग आला आणि बदल म्हणून ते श्रीलंकेमध्ये आले. तिथलं नैसर्गिक आल्हादकारक वातावरण त्यांना एवढं आवडलं की ते तिथंच स्थायिक झाले. मात्र त्यांनी आपला लेखनाचं कार्य तिथूनच चालू ठेवलं. त्यांचा मृत्यूही श्रीलंकेतच झाला. असं सांगतात की त्यांच्या लेखनाला लंकेतच अधिक बहर आला. म्हणजे केवळ वातावरणातला बदलही तुमच्या कार्याला पोषक ठरू शकतो.
मनुष्याला कामातला, चवीतला, वातावरणातला बदल नक्कीच आवडतो. परंतु एक बदल मात्र त्याच्या पचनी पडत नाही असं दिसतं. हा बदल म्हणजे वागण्यातला बदल, ऍटिट्यूडमधला बदल किंवा विचारातील बदल. यामुळेच सामाजिक बदल हा सर्वात कठीण बदल होऊन बसला आहे. स्त्री-पुरुष समानता, हुंडाबंदी, जातीयता विरोध अशी सगळी सामाजिक उत्क्रांतीची तत्त्वं मनातून पटत असूनही आपल्या कृतीत त्याप्रमाणे बदल करायला लोक तयार नसतात.
आपल्या बचावासाठी ते कुठलीही कारणं पुढे करतात. मला पटतं हो, पण घरच्यांचा विरोध आहे अशी कारणं ऐकायला मिळतात. एक गृहस्थ अतिशय उद्धट होता. विनाकारण तो इतरांना घालून-पाडून बोलत असे. एकदा तो म्हणाला, मला लोक टाळतात हो! त्याचा उद्धटपणा हेच त्याला कारणीभूत आहे असं सांगितल्यावर प्रथम उद्धटपणे त्यानं ते नाकारलं पण मग थोडा विचार करून ते कबूल केलं. अर्थात नुसतं कबूल करून काय उपयोग? सुंभ जळला तरी पीळ जात नाही हेच खरं!
श्रीनिवास शारंगपाणी