बारामती -ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी बारामती येथे आयोजित केलेला राज्यव्यापी एल्गार महामोर्चा करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक सभेत रूपांतर करण्यात आले आहे.
प्रशासकीय भवनसमोर प्राथमिक स्वरूपाची सभा घेऊन प्रशासनास निवेदन दिले जाणार असल्याचे आरक्षण कृती समितीने जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र अप्पर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
ओबीसी आरक्षण व इतर मागण्यांसाठी (दि.29) ओबीसी समाजाच्या वतीने एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याबाबत राज्यभर जनजागृती करण्यात आली होती.
मात्र, दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील तळई गावात झालेली दुर्घटना व महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रावर दुःखाचे सावट आहे. अशा दुःखाच्याप्रसंगी मोर्चा काढणे सामाजिकदृष्ट्या हिताचे नाही.
त्यामुळे एल्गार महामोर्चाचे रूपांतर प्रतिनिधिक स्वरूपाच्या सभेतत करण्यात आले आहे. प्रतिनिधिक सभेच्या माध्यमातून प्रशासनास निवेदन देण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
मर्यादित लोकसंख्येत ही सभा होणार असल्याचे आयोजक ऍड. जी. बी. गावडे, ज्ञानेश्वर कौले, बापूराव सोलनकर, पोपटराव धावडे, मच्छिंद्र टिंगरे, चंद्रकांत वाघमोडे, संभाजी चव्हाण, नानासाहेब मदने, गोविंद देवकाते स्पष्ट केले आहे.