पुणे – खडकवासला धरणात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत कालव्यातून 1 हजार 155 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून मुठा नदीत 1 हजार 929 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, पानशेत धरण 91 टक्के भरले असून धरणात 9.67 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 24.48 टीएमसी म्हणजे 87 टक्के जमा झाला आहे.
खडकवासला प्रकल्पात बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. खडकवासला धरणात दिवसभरात 0 मिमी, पानशेतमध्ये 8 मिमी, वरसगावमध्ये 5 मिमी आणि टेमघरमध्ये 20 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण यापूर्वीच 100 टक्के भरले आहे.