नवी दिल्ली – कोविडच्या विषाणूने अख्ख्या जगात हाहाकार माजविला असतानाच द्रव आहाराच्या (फ्ल्यूड डायट) माध्यमातून एका वर्षांत 60 हजार रुग्णांना करोनामुक्त करण्याचा दावा डॉ. विश्वरूप राय चौधरी यांनी केला आहे. ही बाब भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने स्वीकारली आहे. आता आरोग्य मंत्रालयाने सुध्दा याचा प्रचार-प्रसार करावा, अशी मागणी चौधरी यांनी केली.
डॉ. विश्वरूप राय चौधरी म्हणाले, कोविडच्या आजाराचा उगाच बाउ केला जात आहे. हा आजार द्रव आहाराच्या माध्यमातून तीन ते सात दिवसांत दूर केला जावू शकतो. यात नारळाचे पाणी आणि मोसंबीचा रस दिला जातो.
करोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या बातम्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, करोनाची तिसरी लाट येवो वा चौथी. द्रव आहाराच्या माध्यमातून त्यावर सहजपणे मात केली जावू शकते.
डॉ. चौधरी म्हणाले, आम्ही 750 तज्ज्ञांची एक टीम तयार केली आहे. या टीमच्या माध्यमातून मागील एका वर्षांत 60 हजार रुग्णांना बरे केले आहे. या मोहिमेला नेटवर्क ऑफ एन्फ्लुएंझा केअर एक्सपर्ट (एनआयसीई) असे नाव देण्यात आले आहे. कोविडच्या रूग्णांची वाढती संख्या आणि वाढत असलेला मृत्यूदर थांबविण्यासाठी द्रव आहाराचा अवलंब करण्यास लोकांना प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. चौधरी यांनी मलेशियातील लिंकन विद्यापीठ आणि राजस्थानमधील श्रीधर विद्यापीठाच्या माध्यमातून तीन हजार लोकांना नाइस प्रोटोकॉलसाठी प्रशिक्षित केले. अहमदनगर, भोपाळ आणि जयपूर अशा तीन ठिकाणी कोविड रूग्णांवर 24 तास उपचार केला गेला.
आतापर्यंत 60 हजार रूग्ण कोविडमुक्त झाले आहेत. हा उपचार करताना एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आले नाही, अशा दावाही त्यांनी केला.
नाइस प्रोटोकॉलच्या माध्यमातून जे रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते त्यात 20 ते 35 टक्के रूग्ण गंभीर या प्रकारात मोडत होते. यातील अनेकांची ऑक्सीजन पातळी 70 टक्क्यांपेक्षाही कमी होती. मात्र, या पध्दतीनुसार उपचार करताना कुणालाही ऑक्सीजनची नळी लावावी लागली नाही. कोविडची लस घेतलेले रूग्ण सुध्दा उपचारासाठी दाखल झाले होते, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.