मुंबई – आज संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य सरकारने करोनाची परिस्थिती लक्षात घेता वारीला परवानगी दिली नाही. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारीच पंढरपूरला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
याआधिच्या पुजेला सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर असा दोन्ही साईडचा प्रवास केला होता. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क लावल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. बैठका घ्यायच्या असतील तर त्या ऑनलाइन घेण्यावरही त्यांचा भर असतो. शिवाय करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कुठेही जायचे असेल तर ते स्वत: गाडी चालवत जात आहेत. त्यांच्या निवासस्थानाहून मंत्रालयात जायचे असेल तरीही ते स्वत: गाडी चालवत जातात.