मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पुन्हा पाऊस कोसळत आहे. आज पहाटेपासून उपनगरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
#WATCH | Maharashtra: Parts of Mumbai face waterlogging, following heavy rainfall this morning. Visuals from Wadala
Regional Meteorological Centre, Mumbai predicts “light to moderate rain in city & suburbs with possibility of heavy rainfall at isolated places” for next 24 hours. pic.twitter.com/wPgOZUukms
— ANI (@ANI) July 16, 2021
यातच मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सांताक्रुज,अंधेरी, हिंदमाता, परेल, कुर्ला यासारख्या अनेक भागात ट्रफिक झालं असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या वेळी अनेकजण कामासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यातच कोसळणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी गुडघाभर साचलेल्या पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढावी लागत आहे. जास्तच पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासूनच वीजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामानखात्याने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात पहाटे पासून पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. रात्री पावसाने उसंत दिल्याने राजापूर कोदवली नदीला आलेला पूर ओसरला होता. त्यामुळे राजापुर बाजार पेठेचा धोका टळला होता. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत होत्या परंतु पहाटे पासून कोसळणार्या पावसामुळे पुन्हा आज दिवसभरात परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.