हिंदु-मुस्लिमांनी पूर्वग्रह सोडावेत – हमीद दलवाई
पुणे, ता. 13 – “भारतामधील हिंदु-मुस्लीम प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर दोन्ही समाजात असणारे पूर्वग्रह प्रथम दूर करावयास हवेत. जात, धर्म, वंश, लिंग या व्यतिरिक्त राष्ट्रवादाची आपण कास धरली पाहिजे’, असे विचार मुस्लीम सत्यशोधक समाजाचे नेते हमीद दलवाई यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात बोलताना व्यक्त केले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय “भारतीय मुस्लिमांच्या समस्या’ असा होता. त्यांनी मुस्लिमांच्या समस्या यावेळी मांडल्या.
कोचीन किनारी भाग दुष्काळी ठरविला
त्रिवेंद्रम – केरळ सरकारने कोचीनमधील किनारी भाग हा दुष्काळी म्हणून जाहीर केलेला आहे. या भागातील लोकांना मोफत रेशन पुरविण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री अच्युत मेनन हे दिल्लीला जाणार असून केरळमधील अन्न परिस्थितीबाबत केंद्र सरकारला कल्पना देणार आहे.
पानशेत पूरग्रस्तांनी अखेरची धडक द्यावी
पुणे – जी घरे तात्पुरता निवारा म्हणून बांधली, ज्यांची दहा वर्षांची आयुर्मर्यादा संपली अशा घरात लोकांना ठेवणे चूकच आहे. पण त्यांच्याकडून भाडे वसुली करणे ही शुद्ध लुबाडणूक आहे, म्हणून पूरग्रस्त वसाहतीतील घरे सरकारने पूरग्रस्तांना मालकी हक्काने देऊन टाकावे असे विचार मा. खंडकर यांनी पर्वती दर्शन येथील जाहीर सभेत व्यक्त केले. गुरुवारी
12 जुलै रोजी पानशेत पुराच्या 12 व्या वर्षदिनानिमित्त जाहीर सभा झाली. ते पुढे म्हणाले, आता पूरग्रस्तांनी निर्धार करावा. या प्रश्नाचा शेवट करण्यासाठी अखेरची धडक द्यावी.
पाकमध्ये दुसरा अणुशक्ती प्रकल्प
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात एक प्रचंड अणुशक्ती वीज केंद्र स्थापन करण्याचे पाक सरकारने ठरविले आहे. पाक अणुशक्तीमंडळाचे अध्यक्ष मुनीर अहमद यांनी असे सांगितले की, हा अणुशक्तीचा प्रकल्प येत्या 10 वर्षांत पूर्ण होईल.