नियमित परिपाठ, स्नेह संमेलन, खेळाच्या तासावर निर्बंध
आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक उपाययोजनांचे काटेकोर पालन आवश्यकच
पुणे- राज्यातील करोनामुक्त क्षेत्रांत इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना करोनाची चाचणी करावीच लागणार आहे. दरम्यान, जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा दरदिवशी सकाळ-दुपार अशा दोन सत्रांत भरवाव्या लागणार आहेत.
करोनामुक्त भागात शाळा सुरू करण्यास शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. अशा वेळी शाळेत हात धुण्यासाठी सुुविधा उपलब्ध करावी लागणार आहे. एखाद्या शाळेत यापूर्वी क्कारंटाइन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतरत्र न्यावे. या शाळांचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. क्कारंटाइन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी लागणार आहे.
शाळेत परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर गर्दी होतील अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यास कडक निर्बंध असणार आहेत. शाळेत प्रात्यक्षिक कार्य घेताना विद्यार्थ्याचे लहान-लहान गट करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक नाही
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून ती पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात येणार आहेत. पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत:च्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडणे आवश्यक आहे. आजारी असलेल्या किंवा लक्षणे असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नयेत.
…तर तातडीने रुग्णालयात न्या
विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिला शाळेच्या आवारात आणि प्रवेशद्वारावर येण्यास बंदी असेल. शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी करोनासंशयित आढळल्यास त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करावे किंवा जिल्हा व राज्य संपर्क क्रमांकास कळवावे लागणार आहे. हेल्पलाइनचे नंबर व करोना सेंटरची माहिती मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकाला बाळगावी लागणार आहे.
एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा लागेल
एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थीच असावेत
* दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर हवे
* शिकविण्यासाठी ठराविक विषयांनाच प्राधान्य द्यावे
* दिवसाआड किंवा सकाळ-दुपार सत्रात वर्ग भरवावेत
* विद्यार्थ्यांनी स्वत:ची पाणी बॉटल सोबत ठेवावी
* विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याची अदलाबदल करू नये
* शाळांच्या दर्शनी भागावर मार्गदर्शक सूचना प्रदर्शित कराव्या लागणार
* मास्कचा वापर करावाच लागेल
* साबणाने वारंवार हात धुवावे लागणार