लखनौ – राफेल व्यवहारातील भ्रष्टाचाराचे आरोप बातम्यांचा आणि जनसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे मोदी सरकारनेही संबंधित आरोपांची दखल घ्यावी, अशी भूमिका बसपच्या प्रमुख मायावती यांनी सोमवारी मांडली.
राफेल प्रकरणी फ्रान्स सरकारने चौकशीचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे भारतात राजकीय वादंग सुरू झाले आहे. त्या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यावर मायावती यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवहारांत दलालीचे आरोप नवे नाहीत. कॉंग्रेस सरकारांच्या काळापासूनच तो जुना आणि ज्वलंत मुद्दा ठरलेला आहे. आताच्या सरकारने जनतेचे समाधान होईल अशा पद्धतीने राफेल प्रकरण संपवायला हवे, असे त्यांनी म्हटले.