बीड: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरू लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या अखत्यारीत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा राजकारण होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी सध्या छत्रपती संभाजी महाराज सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा. संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो.
संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना बाहेर पडावं लागेल. पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.
तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले होते.