नवी दिल्ली – करोना वाढण्याच्या शक्यतेमुळे विविध राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे खरोखरच करोना नियंत्रणात येईल का याची शाश्वती नाही. मात्र अर्थव्यवस्था, रोजगार निर्मितीवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे असे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी म्हटले आहे.
बजाज यांनी एप्रिल महिन्यात बजाज ऑटोच्या बिगर कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. भागधारकांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात त्यानी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेबाबत फारसा विचार न करता निर्बंध लागू करण्यात येत आहेत, ही बाब चिंताजनक आहे.
ऑक्टोबर- डिसेंबर 2020 या तिमाहीमध्ये विकास दर केवळ 0.4 टक्क्यांनी वाढला होता. आता आगामी काळात विकास दर वाढत राहील की नाही याबाबत शंका निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संसर्ग होणार नाही अशा पद्धतीने नागरिकांना काम करू देण्याची गरज आहे.
मात्र सरळ सरळ निर्बंध लादले जात आहेत असे बजाज म्हणाले. गेल्या वर्षात वेळोवेळी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला आगामी काळात प्रधीर्ग काळ परिणाम भोगावा लागणार असल्याचे ते म्हणाले.