नवी दिल्ली – भारतात करोनाची तिसरी लाट येणे अटळ असून ही लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत येण्याची शक्यता आहे, असे दिल्लीतील एम्स संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला आहे. शक्य तितक्या वेगाने नागरिकांचे लसीकरण हाच अशा लाटा थोपण्याचा खात्रीशीर इलाज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अनेक राज्यांनी लॉकडाऊन उठवले आहेत. त्यामुळे बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.
त्यातूनच पुन्हा करोना पसरण्याचा धोका वाढतो आहे. त्याखेरीज करोनाचा नवा विषाणूही कार्यरत झाला आहे की याचेही संशोधन सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हा विषाणू आपले स्वरूप सतत बदलत आहे. त्यामुळे या अनुषंगिक घडामोडींकडे काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे.
नव्या विषाणूंचे हॉटस्पॉटही शोधून त्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.