नवी दिल्ली – कॉंग्रेस सत्तेवर आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याचा विचार केला जाईल, असे जे विधान कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केले आहे त्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी समर्थन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, दिग्विजयसिंह यांनी काश्मिरी लोकांच्या भावनांची कदर केली आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जम्मू काश्मिरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन याच मागणीचा आग्रह धरला आहे. जम्मू-काश्मीरला असलेली विशेष राज्याची सुविधा काढून टाकल्यामुळे तेथे मोठे जनआंदोलन झाले असून तेथील जनजीवन अजूनही सुरळीतपणे पूर्वपदावर आलेले नाही.
दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र तेथे अवलंबले आहे. तसेच तेथील दहशतवाद अजूनही थांबलेला नाहीं या पार्श्वभूमीवर राज्याला शांतता बहाल करण्यासाठी विशेष राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा, अशी तेथील पक्षांची मागणी आहे.