भोर – भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील रायरेश्वर किल्ल्यासमोरच वाई हद्दीतील केंजळ गडावर 450 फूट दरीत कोसळून दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला. पाकिरे वस्तीवरील ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केंजळ गडावर (दि.12) पहाटे वडील गणेश उरणे (वय 35) व त्यांचे 5 ते 6 तरुण मित्रांसह मयांक गणेश उरणे हा पर्यटनासाठी आला होता. पहाटेच्या धुक्यात रस्ता न दिसल्याने केंजळ गडावरुन थेट 450 फूट खोल दरीत कोसळला. ही माहिती पाकिरे वस्तीवरील ग्रामस्थांना पर्यटकांकडून समजली.
रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे नथू पाकेरे, दशरथ पाकेरे, सागर पाकेरे, विलास पाकेरे, सुरेश पाकेरे, सचान, नवनाथ व ज्ञानेश्वर पाकेरे हे ग्रामस्थांसह मदत कार्यासाठी गडावर धावून गेले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन खोल दरी, गर्द झाडी- झुडपातून वाट काढत दरीच्या तळाशी जखमी अवस्थेत पडलेल्या मयांकला सुखरुप बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले. मयांक हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी वाई येथे हलवण्यात आले असल्याची माहिती नथू पाकिरे यांनी दिली. मयांकवर काळ ओढवला होता. मात्र, वेळ आली नव्हती. त्यामुळेच त्याचे प्राण वाचले.
मयांक हा सासवड-जेजुरी येथील रहिवाशी असल्याचे समजते. त्याचे वडील व मित्रांसह पहाटे पर्यटनासाठी भोर तालुक्यातून केंजळ गडावर आले होते. केंजळ गडावरील पठारावर असलेल्या श्री केळजाई देवीच्या दर्शनासाठी हे सर्वजण जात असताना ही दुर्घटना घडली.
या घटनेची माहिती वाई पोलिसांना देण्यात आली. वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोतीकर, सुभाष धुळे, सहकारी पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास वाई पोलीस करीत आहेत. मदत कार्य करत असतानाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, खबरदारीचे उपाय म्हणून गडावर येणाऱ्या पर्यटकांना अटकाव करण्याचा निर्णय पाकिरे ग्रामस्थांनी घेतला असल्याचे नथू पाकिरे यांनी सांगितले.