मुंबई – मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील. #मोदीहैतोमुमकिनहै” असा विश्वास कॉंग्रेसकडून वर्तविण्यात आला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी यासंदर्भात व्टि्ट केले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १०२ वी घटनादुरुस्ती व इंदिरा स्वाहनी प्रकरणातील ५० टक्के आरक्षण मर्यादा या मुद्द्यांमुळे पूर्णपणे केंद्राच्या आधीन आहे. संसदेत कायदाही होऊ शकतो. मविआ नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील.#मोदी_है_तो_मुमकिन_है
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 8, 2021
सचिन सावंत म्हणाले की, ”मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १०२ वी घटनादुरुस्ती व इंदिरा स्वाहनी प्रकरणातील ५० टक्के आरक्षण मर्यादा या मुद्द्यांमुळे पूर्णपणे केंद्राच्या आधीन आहे. संसदेत कायदाही होऊ शकतो. मविआ नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील. #मोदीहैतोमुमकिनहै”
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे; पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होईल.