करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने अमिताभ बच्चन यांच्या जगप्रसिध्द आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्याच्याही अगोदर त्यांनी पोलिओबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारला मदत केली आहे.
बच्चन यांचा धीरगंभीर आवाज ऐकल्यावर सगळ्या खिडक्या उघडल्या जातात. मात्र याच बच्चन यांनाही गेल्या वर्षी करोनाने आपल्या विळख्यात घेतले होते. केवळ त्यांनाच नाही तर त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही करोनाची लागण झाली होती.
ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही रूग्णालयात दाखल करावे लागले होते. सुदैवाने या दोघी लवकरच बऱ्या झाल्या आणि आठवडाभराच्या आत रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मात्र बी बी आणि ज्युनिअर बी बराच काळ रूग्णालयात मुक्काम ठोकून होते. या काळात दोघांनी नेमके काय केले अशी उत्सुकता अनेकांना होती. त्याचा अभिषेकने खुलासा केला आहे.
तो म्हणतो की आम्ही अगदी रूममेटसारखे राहत होतो. मात्र या काळात त्यांना (अमिताभ यांना) मी निराश किंवा हताश झालेले पाहिले नाही. त्यांच्या संयमाचे, निर्धाराचे मला कौतुक वाटायचे आणि चकीतही व्हायचो.
मात्र अखेर आम्ही दोघेही बरे झालो व घरी आलो. पहिल्या लाटेत विशिष्ट वयोगटातील लोकांना धोका असल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल काही वेळा मला टेन्शन यायचे. मात्र ते मुळीच निराश किंवा उदास झालेले मी पाहिले नाही.
दरम्यान, अभिषेकच्या बिग बुलला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे. त्याच्या कामाची प्रशंसाही खूप होते. त्यामुळे तोही बराच उत्साही असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. त्याचे दसवी आणि बॉब विश्वास हे दोन नवे चित्रपट लवकरच दाखल होणार आहेत.
अर्थातच त्यांच्याकडून त्यालाही खूप अपेक्षा आहेत. यातील बॉब विश्वासची निर्मिती शाहरूखच्या रेड चिलीज या निर्मिती संस्थेने केली आहे.