नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या भयावह पद्धतीने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. देशात रोज साडेतीन ते चार हजार मृत्यूंची नोंद होत होती. याच काळात बिहार आणि उत्तर प्रदेशात गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगाताना दिसू लागले. यावरून राजकारण प्रचंड तापले होते. त्यावरून मोदी आणि योगी सरकारवर विरोधकांनी टीका केली. मात्र, याच मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भूमिका मांडताना माध्यमांवर आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचे आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली.
दरम्यान, गंगेत सापडलेल्या मृतदेहावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांचे प्रसारमाध्यमांनी केलेले वार्तांकन हा अजेंड्याचाच भाग होता, असा आरोप त्यांनी केला.
महर्षी नारद जयंतीनिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र कुमार म्हणाले, “गंगेमध्ये २०१५ आणि २०१७ मध्येही मृतदेह आढळून आले होते. त्यावेळी तर करोनाची महामारी नव्हती. त्यामुळे आता आढळून येणाऱ्या मृतदेहांचा संबंध करोनाशी जोडणं हा अजेंड्याचाच भाग आहे, हे स्पष्ट दिसतंय,” असे नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.
“माध्यमांनी महामारीच्या काळात आणि एरवी आपली काम चांगल्या पद्धतीने केलं आहे. यंत्रणेतील दोष दाखवून देणं ठिक आहे, पण हे सगळं योग्य वेळी आणि काळजीपूर्वक करायला हवं. त्यातून लोकांमध्ये भीती निर्माण न होता जनजागृती व्हायला हवी,” असे नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. नारद मुनी हे जगातील पहिले पत्रकार होते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानतो.