वर्धा – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे नातलग हिरावले. काही ठिकाणी करोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा, तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात राहणाऱ्या शेंडे कुटुंबाच्या बाबतीतही अशीच दुर्दैवी घटना घडली. करोनामुळे शेंडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान, उपचारासाठी भरलेले पैसे रुग्णालयाने परत केले आहेत.
उषा शेंडे, विलास शेंडे आणि कैलास शेंडे अशी करोनामुळे मृत्यू पावलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. कैलास शेंडे हे वर्ध्यातील बुलडाणा अर्बन बँकेत कार्यरत होते. सर्वप्रथम ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. 7 मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी संपत नाही तर 9 मे रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. तर विलास शेंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यांना उपचारासाठी सावंगी येथे रुग्णालयात भरती केले. 19 मे रोजी त्यांचा देखील मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील आई आणि दोन भावडांचा मृत्यू झाल्याने शेंडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कैलास यांच्या मागे पत्नी, एक आठ वर्षांचा मुलगा, आणि तीन वर्षांची मुलगी आहे. विलास यांच्या मागे पत्नी, एक पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे.
रुग्णालयाने परत केले पैसे –
विलास शेंडे यांना आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचा धक्का रुग्णालयाला देखील बसला. विलास यांच्या उपचारासाठी भरलेले संपूर्ण पैसे रुग्णालय प्रशासनाने शेंडे कुटुंबाला परत केले आहे. रुग्णालयाला ही सर्व घटना कळताच भरलेले पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आणि शेंडे कुटुंबाला 50 हजार रुपये परत केले. अशी माहिती आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.