मुंबई – विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांबाबत केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच विविध राज्यांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, उच्चस्तरीय बैठकीमध्ये बारावी सीबीएसई परीक्षेबाबत निर्णय घेताना जर या परीक्षा पुढील महिन्यात घेण्याबाबत विचार असेल तर पुढील महिन्यात राज्यातील करोना परिस्थिती पाहून परीक्षाबाबत राज्यांना विचार करावा लागेल. यामध्ये बारावीचे विद्यार्थी मागील दीड वर्षापासून अभ्यास करत असताना त्यांची मानसिकता विचारात घेऊनसुद्धा निर्णय घ्यावा लागेल.
कारण परीक्षेबाबत विद्यार्थी खूप संभ्रमात आहेत. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा लागेल. शिवाय विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतसुद्धा पुढाकार घेतला जावा, असे मत त्यांनी बैठकीत मांडले.
न्यायालयासमोरही भूमिका मांडणार
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. अंतर्गत मूल्यमापन अशी मागणी होत आहे. पण आम्ही कोर्टात सर्व म्हणणं मांडू.
दहावीच्या मुलांचे नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. याबाबत राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करून तो हायकोर्टासमोर ठेवू. असाधारण परिस्थितीत न्यायालयसुद्धा या सर्वाचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्तकेली.