रायगड – तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पी-305 बार्ज बुडाले आहे. या बार्जवरील काही कर्मचाऱ्यांचा अद्यापही शोध सुरू आहे. त्यातच रायगड समुद्र किनाऱ्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह पी 305 बार्जवरील कर्मचाऱ्यांचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे एकूण आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे खोल समुद्रात बुडालेल्या पी 305 बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे.
सध्या हे आठही मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ओएनजीसी पथक नातेवाईकांना घेऊन रायगडात येणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. तसेच ओएनजीसी अधिकाऱ्यांना ओळख पटविण्यासाठी येण्यास कळविले आहे, असे पोलीस निरीक्षक सोनके यांनी सांगितले.