पणजी – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्यात लांबणीवर टाकलेल्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर येत्या बुधवारपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांवर आधारित पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जर अंतर्गत गुण कमी असल्यास आणि कोणता विषय राहत असेल त्यांना एटीकेटीची मुभा असेल, असेही त्यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत जेईई, नीट परीक्षांसंदर्भात केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बुधवारपर्यंत परीक्षांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.
तर अकरावीच्या प्रवेशाबाबत विज्ञान आणि पदविका क्षेत्रात चढाओढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका दिवसाची तीन तासांची ऑब्जेटिव्ह परीक्षा घेऊन त्यानंतर त्या-त्या क्षेत्रात प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.