नवी दिल्ली – देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे. अनेक शहरांमध्ये शवदाहिन्यांसमोर मृतदेहांच्या रांगा लागल्याची छायाचित्रे वर्तमानपत्रातून आणि सोशल मिडियावरून व्हायरल होत आहेत. करोनामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक शहरांमध्ये नव्याने शवदाहिन्या बसवण्याची वेळ आली आहे.
27 एप्रिल रोजी कोलकत्यातील नागरिक अपर्णा यांना त्यांची सहकारी असणारी 37 वर्षांच्या महिलेचे करोनामुळे निधन झाल्याचे समजले. तिच्यावर अनेक आठवडे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांचे वेटिंग असल्याने तिच्यावर मृत्यूनंतर तब्बल 36 तासानंतर अंत्यसंस्कार झाले. तिचा पतीदेखील करोना पॉझिटिव्ह असल्याने त्याने पत्नीच्या निधनाची बातमी महापालिकेला कळवली.
महापालिकेने त्याला अंत्यसंस्कारासाठी टोकन दिले आणि त्याच्या पत्नीच्या आधी तब्बल 79 मृतदेह वेटिंगमध्ये असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याच्या पत्नीचे पार्थिव धापा स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आली. तोपर्यंत पार्थिव शवागारात ठेवण्यात आले होते. स्मशानभूमीत तिचे पार्थिव आणल्यानंतर पुन्हा वेटिंगमुळे अंत्यसंस्कार व्हायला वेळ लागला. तोपर्यंत पाच ते सहा तास तिचा पती स्मशानभूमीत कारमध्ये बसून होता. तिथे प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेले मृतदेह एकामागोमागे एक आणले जात होते. त्यांची ओळख वगैरे पटवण्याचा प्रश्नच नव्हता.शेवटी मध्यरात्री मैत्रिणीवर अंत्यसंस्कार झाल्याचे अपर्णा सांगतात.
बहुतेक शहरांमध्ये अशीच स्थिती आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी नातेवाईक धावपळ करत आहेत. हे सगळे प्रयत्न अपयशी ठरले आणि रुग्ण दगावला तर अंत्यसंस्कारासाठी तासन् तास तिष्ठत थांबावे लागत आहे. अनेक ठिकाणी शवदाहिन्यां व्यतिरिक्त अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त तात्पुरती व्यवस्था उभारण्यात आलेली आहे.
नदीकाठी, रिकाम्या जागी अंत्यसंस्कार होत आहेत. सतत काम करणाऱ्या शवदाहिन्या अनेक ठिकाणी नादुरुस्त होत आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी बंद ठेवाव्या लागत आहेत तर अनेक ठिकाणी नव्याने जास्त शवदाहिन्या उभारण्याची वेळ आली आहे.
हैदराबाद महापालिकेने एप्रिल महिन्यात एलपीजीवर चालणाऱ्या चार नव्या शवदाहिन्या उभारण्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिली. त्यातील दोन सुरु झाल्या आहेत आणि दोन शवगदाहिन्या लगेचच दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी चेन्नईवरून तंत्रज्ञ येणार आणि मग दुरुस्ती होणार.
हैदराबादबरोबरच कोलकता, कटक, मंगळुरू आणि अहमदाबाद येथील महापालिकांनीही नव्या शवदाहिन्या उभारण्याची ऑर्डर दिली आहे. दिल्लीतील सराई कालेखान स्मशानभूमीत आणखी दहा विद्युतदाहिन्या उभारण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
शवदाहिन्या उभारण्याचे काम करणाऱ्या अहमदाबाद येथील शिवांगी फर्नेसचे मालक धिरेन बुच म्हणतात, एप्रिलच्या मध्यापासून शवदाहिन्यांची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणीमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे जोधपूर, टिकमगढ, रुरकेला अशा ठिकाणांहूनही ऑर्डर आलेल्या आहेत.
गुरूग्राम येथील फर्नेस उत्पादक केजी क्रिमिटोरियम कंपनीचे मालक अनुभव मिश्रा म्हणाले, आमच्याकडे वर्षातून पाच शवदाहिन्यांची मागणी असायची. आता महिन्याला पाच शवदाहिन्यांची मागणी नोंदवली जात आहे. ते म्हणाले, अनेक महापालिका, राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सध्या याबाबतची टेंडर निघत आहेत.
मिश्रा यांच्या कंपनीकडे गुरुग्राममधील चार शवदाहिन्या चालवण्याचे काम आहे. त्यासाठी सध्या प्रशिक्षित मनुष्यबळाची टंचाई जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शवदाहिन्या बंद पडण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्याचबरोबर बहुतेकांना स्मशानभूमीत काम करायचे नसते, असेही त्यांनी सांगितले. गुरुग्राममधील शवदाहिन्यांची संख्या दहावरून चाळीस पर्यंत वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
कोईमतूर येथील एन्व्हायरो केस या कंपनीचे मालक के. ईश्वरन म्हणतात, दिल्ली, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमधून शवदाहिन्यांची मागणी वाढलेली आहे. ईश्वरन म्हणतात, सगळेजण विचारतात की, डिलिव्हरी कधी मिळणार आणि प्रत्यक्ष उभारण्याचे काम कधी होईल? मी त्यांना सांगतो माझ्याकडे पुढील महिन्याच्या सगळ्या ऑर्डर बुक झालेल्या आहेत.