नवी दिल्ली, दि. 14 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रदान केला. याद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपयांची मदत पोहचवली गेली आहे.
दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत दिली जात आहे. यात एकूण पाच वर्षात प्रत्येकी 30 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 1 लाख 15 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाच्यावेळी कृषिमंत्री तोमर हेही उपस्थित होते.
ते म्हणाले की, यावेळेपासून पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ दिला जात असून त्या राज्यातील सात लाख शेतकऱ्यांना आज ही मदत पोहोचवण्यात आली आहे. फेब्रुवारी 2019 पासून ही योजना सुरू झाली आहे. यात दरमहा पाचशे रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर झाली आहे. चार महिन्यांचे दोन हजार रुपयांचे हप्ते करून ती मदत दिली जात आहे.