“हितं अंगठा लाव.’ विठ्ठलने सावकाराच्या तोंडाकडं पाहिलं आणि कागद हातात घेतला. काहीवेळ तो त्या कागदाला तसाच न्याहाळत बसला. सावकारानं शाईची दौत जोरात आपटत विठ्ठल पुढं ठेवली. “आरं, फकस्त तीन गुंठा लिहून घितली हाय. उरलेली दोन गुंठा शाबूत हाय. मापात पाप न्हाय करत आपण. अन नसलं इस्वास तर उठ हितनं. मगाधरनं बगतुय त्यो कागूद उराशी धरून बसलायीस. मला काय कामधंदे न्हाईत व्हय?’ दीनवाण्या चेहऱ्याने विठ्ठलने नजर वरती केली आणि दौतीत आपला अंगठा बुडवत कागदावर लावला. तावातावात बोलणाऱ्या सावकाराचा चेहरा क्षणात खुलला. “मोजून घ्ये. सात हजार हायत. मागले वळते करून घेतल्यात.’ विठ्ठलने पैसे खिशात घातले आणि चालू लागला. “विठ्ठल, गरज पडली तर यं परत. म्या तर म्हणत व्हतो; उरलेली दोन गुंठा गहाण ठिवून अजून पैसं घिऊन जायचं व्हतंस. न्हाय म्हंजी; तुजी बायकू पोटुशी हाय; तर ऐन येळला उगाच तुजी पळापळ नगं. ती सुटली पायजेल. जमीन काय; आज न्हाय तर उंद्या सुटल. कसं?’ विठ्ठलने आपल्या दोन्ही हाताच्या मुठा करकचून आवळल्या आणि दातओठ खात भराभरा वाड्याबाहेर पडला.
तळपत्या उन्हात चालून चालून दमलेल्या विठ्ठलची पावलं एका वडाच्या सावलीला थांबली. विठ्ठलने आपली पाठ झाडाला टेकवली आणि डोळे मिटून घेत शांतपणे बसला. भविष्याचा विचार करताना डोळ्यापुढचा अंधार अधिकच दाटून आला होता. त्याचं मन पार सैरभैर झालं होतं. खिशातल्या पैशाकडं पाहून तो स्वतःच्याच मनाशी पुटपुटला. “लय वंगाळ हायस तू. आज तुज्यापायी मी माझी माय इकून टाकली.’ तो पुन्हा शून्यात नजर लावून बसला. तेवढ्यात समोर बस थांबली आणि बेलच्या आवाजानं विठ्ठल भानावर आला. “काय रं विठ्ठल, हितं का बसलास?’ बसमधून उतरलेल्या शंकरने विचारलं. “असंच. ऊन लई चटकत व्हतं म्हणून घडीभर टेकलो होतो. तू कुटं गेलतास?’ “तालुक्याला. कर्जाचा हप्ता थकला होता त्यो भरायला गेलतो. बॅंकेतलं साह्येब म्हणत व्हतं; पुढचं हप्ते येळच्या येळला न्हायी भरलं तर जमिनीवर जप्तीच आणतो.’ हे ऐकून विठ्ठल रागात बोलू लागला. “अंगावरली कापडं पण काडून घ्या म्हणावं. असं न तसं उघड्यावरच पडलोय आमी. शंकरने विठ्ठलच्या खांद्यावर हात ठेवला. “दुष्काळ तर आपल्या पाचवीलाच पुजलेला हाय. जाऊ दे. म्हातारी कशी हाय?’ “बरीच म्हणायचं. जागेवर पडून हाय. शाकु जमल तसं तिला संभाळतीय.’ “अन वहिनी?’ “कालच डाक्टरकडं घिऊन गेलतो. या महिन्यात व्हईल मोकळी म्हणत्यात. काळजी घ्यायला सांगितलंय.’ “काही नड लागलीच तर सांग.’ “कुटं तुजी तरी शीरमंती वर आलीय. अन तसं बी न्हाय येळ पडणार. आजच सावकाराकडं गेलतो. तीन गुंठ्याचा कागूद एकदाचा त्याच्या घशात घालून आलोय.’
विठ्ठल घरी आला. तोंडावर पाणी शिंपडायचं म्हणून अंगणातल्या रांजणात हात घातला. पार तळाशी पाणी हाताला लागलं. ओंजळीत धरलेलं पाणी पुन्हा सोडून देत भिजलेली बोटं डोळ्यावरून फिरवल्यासारखी केली. गोठ्यात बांधलेल्या बैलासमोरचं वाळलेलं चिपाड उचलून तसंच रांजणात बुडवलं आणि पुन्हा त्याच्यासमोर खायला टाकलं. कातडीला चिकटलेली हाडं बघून विठ्ठलच्या पोटात कालवत होतं. उंबऱ्यापाशी उभं राहून आत बाजेवर पडलेल्या आपल्या आईकडं नजर टाकली. “रामाला आला घाम सीता पुसती पदरानी, कोण्या नारीची झाली दिष्ट रथ गेलीत बाजारानी. रामाला आला घाम सीता पुशी लहुलाया, कोण्या नारीची झाली दिष्ट माझ्या पिरतीच्या रामराया….’ शाकु जात्यावर दळत होती. दारात उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडं लक्ष जाताच जात्याची घरघर थांबली. “कवा आलात? अन असं दारात का उभं?’ म्हणत शाकु उठली आणि पाण्याचा तांब्या विठ्ठलसमोर धरला. “किती गोड गळा दिलाय तुला देवानं.’ “अन त्या पसुर गोड नवरा बी.’ विठ्ठल गटागटा पाणी पिऊ लागला. “म्हातारीनं काही खाल्लय का?’ “व्हय. आत्याबाईला आत्ताच खाऊ घातलं. कवा त्यांचा डोळा लागला म्हाईत न्हाय.’ “अन तू?’ “तुमच्याआदी कदी खाल्लय का म्या?’ “तू खाऊन घ्ये.’ “अन तुमि?’ “मला भूक न्हाय.’ विठ्ठलचा आवाज खोल गेला होता. त्याच्या मनाची अस्वस्थता शाकुपासून झाकत नव्हती. ती विठ्ठलच्या बाजूला बसली. “काय झालंय?’ “काय व्हायचं राहिलंय? मरताना बाप म्हणला व्हता, काय बी झालं तरी जमीन इकू नगस. पोटच्या पोरासारखं तिनं पोसलंय आपल्याला. पर माज्यासारख्या कपाळकरंट्याला बापाची शेवटची इच्छा पण पुरी करता न्हाई आली.’ असं म्हणून विठ्ठल आपल्या बायकोच्या कुशीत शिरून लहान पोरासारखं ढसाढसा रडू लागला.
शाकुने आपल्या पदराने विठ्ठलचे डोळे पुसून घेतले. “सटवाईने आधीच कपाळावर कोरून ठेवलेलं कुणाला वाचता आलंय का? नशिबात ज्ये वाढून ठेवलंय त्येला तोंड दिलंच पायजे. अन का म्हणून सवताला कोसत बसलाय? हाडाची काडं झालीत त्या मातीत घाम गाळून; पर या आभाळाला कसलाच पाझर फुटंना.’ “तीन गुंठं सावकाराला लिहून दिली. म्हणत व्हता ऱ्हाइलेली दोन गुंठं पण गहाण ठेव. लई लाचार वाटत व्हतं अन राग पण येत व्हता. गरिबी लई वाईट असतीय.’ विठ्ठलला धीर देत शाकु बोलू लागली. “हातातनं ज्ये निसटलं त्ये जाऊ दया. आता ज्ये पदरात शिल्लक हाय त्ये जपू. अजून काबाडकष्ट करू.’ विठ्ठल शांत होऊन ऐकत होता. “हीच आस ठेवत आजवर जगत आलोत.’ “अन हितपासनं पुडं बी जगायचं.’ “आपण एक यळ सहन करू. पर ह्या मुक्या जनावराचं काय? खायला चारा मिळना न प्यायला पाणी. विहिरी पार आटून गेल्यात. त्ये काय नाय; म्या उंद्या तालुक्याला जातु अन खंड्याला छावणीत सोडून येतु.’
दुसऱ्या दिवशी, “भाकर अन बेसन बांधून दिलय. भूक लागल्यावर वाटत खाऊन घ्या. आज दुपारच्यालाच भरून आल्यासारखं वाटतंय. पाऊस पडल का?’ विठ्ठलने वर आभाळाकडं बघितलं. “काळं ढग तर रोजच जमा व्हत्यात अन चकवा देत वाऱ्यासंग निगुन जात्यात. आभाळाकडं डोळं लावून बसायचं अन त्यानं हुलकावणी देत निगुन गेलं की; डोळ्यात दाटलेलं टिपूस सांडायचं. लई आस लावून नगस बसू.’ असं म्हणून विठ्ठल खंड्याला घेऊन निघून गेला. बराच वेळ होऊन गेला तरी विठ्ठल आला नव्हता. शाकु विठ्ठलची वाट बघत दारापाशी बसली होती. “ह्ये अजून कसं आलं न्हाईत. प्यायचं पाणी संपलय. दिस बी मावळायला आलाय. एक हंडा आणतेच आडावरून.’ स्वतःशी पुटपुटत शाकु उठली. “आत्याबाई, म्या आलेच पाणी घिऊन.’ म्हणून ती निघून गेली. कपारीत उगवलेल्या झुडपात आणि पक्ष्यांनी बांधलेल्या घरट्यात विहीर बुजून चालली होती. समाधीत असल्यासारखी शांत जणू! शाकु हळूहळू विहिरीची एकेक पायरी उतरून खाली जात होती. तिकडे विठ्ठल घरी आला होता. “शाकु कुठंय?’ म्हणून विचारताच म्हातारीने खुणवत पाणी आणायला गेली असं सांगितलं. विठ्ठल आल्या पावली तसाच घराबाहेर पडला. शाकु खडकाचा आधार घेत खाली बसली.
काळपटलेल्या शेवाळाला बाजूला सारत ती ओंजळीने पाणी भरू लागली. मध्येच होणाऱ्या ढगांचा गडगडाट त्या मोकळ्या विहिरीत घुमत होता. कितीतरी वेळाने हंडा अर्धाच भरून झाला होता. आजचं भागलं, या विचारात ती जायला निघाली. शाकु पायरी चढायला गेली तोच तिच्या पोटात एक जोराची कळ आली. हातातला हंडा खाली ठेवून देत ती मटकन खाली बसली. ती वेदनेनं विव्हळत होती. आपल्या दोन्ही हाताने पोटावर दाब देत होती. तिचं शरीर घामानं पार भिजून गेलं होतं. तिच्या किंकाळ्या आणि आतल्या जिवाची बाहेर येतानाची धडपड पाहून पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. नजरेच्या टप्प्यात विठ्ठलला विहीर दिसली तशी त्यानं आपली पावलं झपझप उचलली.
एका क्षणी शाकुच्या किंकाळ्या बंद झाल्या आणि बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज पडताच विठ्ठलने विहिरीकडं जोराची धाव घेतली. त्याने वरून पाहिलं तर; शाकुच्या हातात एक गोंडस बाळ होतं. ती दगडाने त्याची नाळ तोडत होती. “शाकु…’ म्हणून विठ्ठल जोरात ओरडला आणि पायऱ्यांवरून धावतच खाली गेला. त्याने आपल्या बायकोला आणि बाळाला घट्ट मिठीत घेतलं. तो वेड्यासारखा त्या दोघींचेही मुके घेत होता. अचानक पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि ती घरट्यात घुसू लागली. त्या दिवशी आभाळालाही पाझर फुटला होता. जणू मोठ्या तपश्चर्येनंतर; आज त्या विहिरीची “तहान’ भागत होती! कपारीच्या आडोशाला बसून तिच्या कुशीत शिरणारा तो बेधुंद पाऊस बघताना; त्या दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू पाझरत होते!
अमोल भालेराव