पुणे : कोरोनाची तिसरी लाट थोपावण्यासाठी लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोनासंसर्ग नक्की कमी होईल. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगत कोविड -19 च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी साळुंखे यांनी ही माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. तर खासदार गिरीश बापट म्हणाले, लसीकरण नियोजन व्यवस्थितपणे होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समन्वयातून जनतेला अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा देवू शकतो.
डॉ. अमोल कोल्हे यांनी ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांबाबत त्यांच्या आरोग्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना दिली. तर श्रीरंग बारणे यांनी ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसीवीर याबाबतचे नियोजन चांगले आहे. क्रियाशील रुग्णसंख्या घटते आहे, ही चांगलील बाब असून येणाऱ्या कालावधीतही रुग्णसंख्या विचारात घेत नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिदधार्थ शिरोळे, आमदार चेतन तुपे यांनीही आपले मत मांडले.
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि।जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ट्रॅकिंग व टेस्टिंग, कंटेनमेंट झोन, लसीकरण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन मागणी, रेमडेसीवीर मागणी व सद्यस्थिती, पुरवठा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.