पालघर – सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हैदोस घातला आहे. या कोरोनामुळे देशाच्या सर्व स्तरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तसेच आरोग्य यंत्रणा ही पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे इंजेक्शनची कमतरता तर कुठे ऑक्सिजन अभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यात लसींचा तुटवडा कायम असून पुन्हा एकदा शुक्रवार पासून (दि. ३१) जिल्ह्यात बहुतांश लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली. एकीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. आणि अश्यातच लसीकरणाचा वेग मंदावल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
वसई-विरार महानगरपालिकेसह एकूण ८८ लसीकरण केंद्र असून यातील ७१ केंद्रे पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. शुक्रवापर्यंत ग्रामीण भागातील १३ तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील १७ लसीकरण केंद्रे सुरू होती. पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती औषध भांडारात एकही लसीची कुपी शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढावली.