रेडा -इयत्ता दहावीच्या जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. 13 लाख इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना मे अखेरीस परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे हे योग्य आहे का? बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी करोनाच्या परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहून त्यांचे जीव पणाला का लावावेत? महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, त्यामुळे त्यांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, असे मत जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
राज्यात सध्या करोनाचे महाभयंकर संकट निर्माण झाले आहे. करोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील मे महिन्यामध्ये परीक्षासाठी सामोरे जावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची या महाभयंकर संकटात त्यांच्यापुढे मोठी समस्या आणि आव्हान निर्माण होणार आहे. बारावीच्या 13 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा द्यावी लागणार असल्याने राज्य सरकारने त्यांचा जीव पणाला लावला आहे.
महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांपुढे फार मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आपल्या बोर्डाच्या माध्यमातून ही परीक्षा व मूल्यांकन हे ऑफलाइन न घेता त्याचे नियोजन ऑनलाइन पद्धतीने करावे, अशी प्रमुख मागणी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी यावेळी केली.