गुरुग्राम – फरिदाबादमध्ये अपघातात जखमी झालेल्या गाईवर गुरुग्राममध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी गाईच्या पोटातून तब्बल 71 किलो प्लॅस्टिक आणि धातूचा कचरा बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे प्लॅस्टिकच्या कचऱ्याची समस्या तसेच खाद्याच्या शोधात गाईंना कचराकुंडीतील कचरा खावा लागत असल्याची गंभीर समस्या पुढे आली आहे.
पशुवैद्यकांनी या गायीवर चार तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून 71 किलो कचरा बाहेर काढला. त्यामध्ये प्लॅस्टिक आणि अन्य विघटन न होणाऱ्या धोकादायक वस्तू त्यामध्ये आढळल्या. सुया, नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, सेफ्टी पिना अशा अनेक गोष्टी सापडल्या. कचरकुंडीतील कचऱ्याद्वारे गायीच्या पोटात या गोष्टी गेल्या असाव्यात.
गायीवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी गाय अद्याप धोकादायक स्थितीतून बाहेर आलेली नाही. पुढील दहा दिवस तिच्या प्रकृतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, असे पशुवैद्यक अतुल मौर्य यांनी सांगितले. सात वर्षांच्या या गायीवर मौर्य आणि आणखी दोन पशुवैद्यकांच्या टीमने शस्त्रक्रिया केली.
या गायीला फरिदाबादमध्ये एका कारने धडक दिल्याने ती जखमी झाली होती. त्यानंतर तिला देवाश्रय प्राणी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी ती स्वतःच्या पोटावर लाथ मारत असल्याचे आढळून आल्याने तिच्या पोटात वेदना होत असल्याचा संशय पशुवैद्यकांना आला. काही चाचण्या आणि एक्स-रे काढल्यानंतर तसेच अल्ट्रासाऊंडवर तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात हानीकारक गोष्टी असल्याचे आढळून आले. शस्त्रक्रियेच्या वेळी या गायीच्या पोटातील चार कप्पे स्वच्छ करण्यासाठी चार तास लागले असे डॉ. मौर्य यांनी सांगितले.
प्राणी हक्क चळवळीतील कार्यकर्ते आणि पीपल फॉर अनिमल्स ही स्वयंसेवी संस्था रवी दुबे म्हणतात, जनावरांचे मालक त्यांचे चारापाणी करण्याऐवजी त्यांना मोकाट फिरायला सोडतात. मग या गायी, जनावरे मिळेल ते खातात. अनेकदा कचराकुंड्यांमध्ये नखे, ब्लेड, मर्क्युरी सल्फाईड असणारे कुंकू अशा घात गोष्टी कचऱ्यात टाकतात. अगदी नख जरी गाईच्या पोटात गेले तरी ते तिच्या आतड्यासाठी घातक ठरू शकते. शिळ्या अन्नपदार्थांबरोबरच घरातील अन्य कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कचराकुंडीत टाकतात. त्यामुळे गायीच्या पोटात कचरा तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्याही जातात.
आता गायींना चरण्यासाठी कुरणे उरलेली नाहीत आणि मालक त्यांना मोकळे सोडून देतात. त्यामुळे त्या खाण्याच्या आशेने कचराकुंडीकडे जातात. लोकांनी कचऱ्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे थांबवले पाहिजे. पालिका आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने जनावरांच्या दृष्टीने आणि पर्यावरण पूरक पावले उचलली पाहिजेत.