सुरत – देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढण्यास सुरुवात झाली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचे चित्र गुजरातमधील सुरतमध्ये आहे.
शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरतमध्ये आहे. शहरातील वराछा येथील अश्निनीकुमार स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी टोकन घ्यावं लागत आहे. टोकन घेतल्यानंतर लोक आपली वेळ येईपर्यंत वाट पाहतात. एवढंच नाही, तर टोकन सिस्टममध्येही काही लोक लाच देऊन लवकर अंत्यसंस्कार करत असल्याचा आरोप आहे. या स्मशानभूत अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या रांगांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते हरिश गुज्जर यांनी आरोप केला की, अंत्यसंस्कारासाठी लाईनमध्ये उभं राहायचं नसल्यास, 1500 ते 2000 रुपयांची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडे करण्यात येते.