नंदीग्राम – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. या टप्प्यामध्ये ३० मतदारसंघांमधील शेकडो उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणारअसून यात नंदीग्रामचा देखील समावेश आहे. नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निष्ठावंत मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात खुद्द ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष मतदानावेळी नंदीग्राम येथे हिंसक वळण लागल्याचे वृत्त आहे.
तृणमूल काँग्रेसने भाजप कार्यकर्ते व बाहेरून आणलेले गुंड मतदान केंद्रांवर दहशत माजवत असल्याचा आरोप लगावला आहे. या आरोपांनंतर आपल्या नंदीग्राम येथील निवासस्थानावरून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असलेल्या ममता बॅनर्जी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडल्या. त्या भोयाल येथील मतदानकेंद्रावर पोहचल्या असता येथे भाजप कार्यकर्त्यांनी, ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
ममता यांनी येथूनच राज्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांना फोनवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी, ‘बाहेरून आलेले लोक येथे दहशत माजवत आहेत. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकत’ अशी माहिती दिली.
बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ‘आपण सकाळपासून निवडणूक आयोगाकडे मतदान प्रक्रियेशी निगडित ६३ तक्रारी दाखल केल्या आहेत, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. घोषणा देणारे लोक बिहार व उत्तर प्रदेशातून येथे आणण्यात आले असून त्यांना केंद्रीय राखीव सुरक्षा दलांकडून मदत करण्यात येत आहे.’ असा गंभीर आरोप लगावला.