कोणालाही भेटल्यानंतर प्रथम भेटीत लक्ष जाते ते त्याच्या त्वचेकडे, त्वचेचा टवटवीतपणा, तजेलदारपणा आणि रंग नजरेत भरतात. नितळ त्वचा आणि चमकदार मुलायम केस हा तर आरसाच आहे शरीराचा. या दोन्ही गोष्टी व्यक्तिमत्त्वात भरच घालतात. त्यासाठी सदैव त्वचा आणि केसांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी, सौम्य व्यायाम व शांत स्वभाव यांची आवश्यकता असते. रोज नियमितपणे क्लीनिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग (सीटीएन) करणे हे निरोगी तजेलदार त्वचेचे रहस्य आहे. क्लीनिंगमुळे मेकअप, प्रदूषण, धूळ इत्यादी त्वचेवरून काढून टाकण्यास मदत होते. टोनिंगमुळे त्वचेला नवीन चैतन्य प्राप्त होते आणि मॉइश्चरायझिंगमुळे त्वचेला ओलावा मिळतो.
त्वचेचे दोन प्रकार असतात : तेलकट आणि कोरडी. तेलकट त्वचेवर फोड, मुरूम येणे साहजिक असते. तेलकटच्या विरुद्ध कोरडी त्वचा असते. कोरडी त्वचा निस्तेज दिसते, तिला नैसर्गिक ओलावा नसतो.
त्वचेची काळजी घेताना रंगीबेरंगी साबणांना आकर्षित न होता त्वचा-प्रकारानुसार साबण/फेसवॉश निवडणे, सनस्क्रीनचा वापर करणे, नाइट क्रीम वापरणे अशा अनेक चांगल्या सवयी अंगी बाळगणे फायदेशीर ठरते. ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यात त्वचा रापणे, टॅन होणे, त्वचा निस्तेज दिसणे असे त्रास होतात, तेव्हा चांगल्या प्रकारचे सनस्क्रीम वापरणे, होता होईल तेवढा कमी मेकअप करणे व शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे असते.
पावसाळ्यात चेहऱ्यावर धूळ जमतेच; शिवाय बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत योग्य क्लिंझर वापरून त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेतील ओलावा कमी होऊन काळपटपणा येतो. अशा वेळी चांगल्या प्रकारचे मॉइश्चरायझर वापरावे.
ऋतुप्रमाणे वयोमानानुसार त्वचेत अनेक बदल होतात. उतारवयात त्वचेला सुरकुत्या येऊ नयेत, म्हणून नियमित फेशियल करणे, अँटीएजिंग क्रीमचा वापर करावा. तेलकट त्वचेच्या मानाने कोरडी त्वचा उतारवयात फार लवकर सुरकुतलेली दिसते. त्यामुळे आहार, रोजच्या सवयी इत्यादी गोष्टींमध्ये थोडा बदल करून त्वचेतील लवचिकपणा राखली जाऊ शकते.
तरुण वयात मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मुरूम-पुटकुळ्या येतात, त्यामुळे सौंदर्यात, व्यक्ति -मत्त्वात बाधा येते. अशा वेळी पुढील उपाय करावेत :
चेहरा दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ व भरपूर पाण्याने धुवावा.
फास्ट फूड, जंक फूड, बेकरी पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नयेत.
गुलाबजल चेहऱ्याला टोन करून पोषण देते. रोज रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल घेऊन चेहऱ्याला लावून झोपावे.
एलोवेरा जेल चेहऱ्यावर आणि मानेवर लावून चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा.
मुरूम (पिंपल्स) फोडल्याने पू बाहेर येऊन चेहऱ्यावर अजून मुरूम येऊ शकतात, यामुळे मुरूम फोडू नयेत.
मुलतानी माती आठवड्यातून दोनदा लावल्यास मृत त्वचा निघून जाते.
नियमित स्क्रबिंग केल्याने मृत त्वचा निघून जाते.
तेलकट त्वचेसाठी सौम्य क्लिनिंग क्रीम आणि स्क्रब वापरणे योग्य. घरच्या घरी हळदीचे किंवा चण्याचे पीठ आणि दूध किंवा गुलाब जल असा पॅक तयार करून वापरल्यास त्वचा चमकदार होते.
कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर वापरावे आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
तैलीय भागासाठी क्लिन्झर आणि नियमित स्क्रबर वापरावे.