– अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघाने जिंकली. केवळ हीच मालिका नव्हे तर त्यापूर्वी झालेली कसोटी तसेच टी-20 सामन्यांची मालिकाही भारतानेच जिंकली. ही अनोखी हॅटट्रिक विराट कोहलीच्या संघाने साकार केली. मात्र, तरीही इंग्लंडच्या या दौऱ्यात भारताने जेतेपद मिळवले असले तरीही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आगामी काळात ज्या मालिका, दौरे व प्रामुख्याने टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे, त्यासाठी तयारी करत असलेल्या भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन घालणारे काही मुद्दे आहेत, त्याचे निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.
पहिला मुद्दा म्हणजे भारतीय संघाकडे स्पेशालिस्ट फलंदाज असूनही चांगली सलामी मिळण्यात सातत्य पाहण्यात आलेले नाही. कसोटी किंवा कोणत्याही फॉरमॅटचा विचार केला, तर रोहित शर्मापासून पृथ्वी शॉपर्यंत अनेक फलंदाज आपण ट्रायल बेसिसवर वापरून पाहिले; पण तरीही अर्धशतकी किंवा शतकी सलामी देण्यात आपण सातत्य राखण्यात अपयशी ठरत आलो आहोत. मधल्या फळीचा विचार केला तर कर्णधार विराट कोहलीचे अपयश कुठेतरी खटकते. त्याच्याकडे जगातील सर्वात बलाढ्य फलंदाज म्हणून पाहिले जाते. मात्र, त्याला गेल्या दोन वर्षांत शतक फटकावता आलेले नाही. त्याने काही अप्रतिम खेळी केल्या, मात्र सिंहाकडून नुसत्या गुरकावण्याची नव्हे तर गर्जनेची अपेक्षा असते.
भारताकडे स्पेशालिस्ट सलामीवीर म्हणावे तर एक-दोन नव्हे तर चार-पाच फलंदाज आहेत, पण सातत्य एकाकडेही नाही किंवा त्यांना दाखवता आलेले नाही. मधल्या फळीचा विचार केला तर कोहलीचा काही खेळींचा अपवाद वगळला तर थेट पाचव्या, सहाव्या क्रमांकावरील ऋषभ पंत, हार्दिक पांड्या यांच्यावरच अपेक्षा ठेवाव्या लागल्या आहेत. त्यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला आहे यात शंका नाही, पण जे काम पहिल्या चार फलंदाजांनी करायला हवे ते झाले नाही. ही मालिका भारताच्या अनेक कमकुवत दुव्यांचा ऊहापोह करणारी ठरली आहे. भारताने ढिसाळ क्षेत्ररक्षण, झेल घेण्यात वारंवार येत असलेले अपयश, गोलंदाजांच्या कामगिरीत न दिसणारे सातत्य अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याची गरज आहे.
आता देशात आयपीएलचे वारे वाहू लागतील, पण त्यानंतर भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक प्रचंड व्यस्त आहे. त्यात यश मिळवायचे असेल तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व, मानसिकता, व्यूहरचना व त्याची काटेकोर अंमलबजावणी यांबाबत केवळ चर्चा करून उपयोग नाही, तर ते प्रत्यक्ष मैदानावर यशस्वी झाल्याचे दिसले पाहिजे. संघातील नवोदित खेळाडूंनी सरस कामगिरी केली आहे, पण त्यांचा अनुभव कुठेतरी कमी पडताना दिसला आहे. तसेच त्यांना काहीवेळा असे सांगावेसे वाटते की, ते देशांतर्गत स्पर्धा नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहात. या किंवा त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपासूनच भारताच्या नवोदित खेळाडूंनी चमक दाखवली आहे. मात्र, त्यांना प्रमुख फलंदाजांसाठी वारंवार संघातून बाहेर ठेवले गेले आहे.
तसे पाहायला गेले तर ही इंग्लंडची मालिका याच नवोदितांसाठी किंवा सेकंड बेंचसाठी आगामी काळात होत असलेल्या महत्त्वाच्या स्पर्धांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. त्यात काही खेळाडू यशस्वीही झाले, पण काही खेळाडूंनी आपल्या खेळात जबाबदारीची जाणीव ठेवली नाही तर त्यांच्या कारकिर्दीला वेळेपूर्वीच पूर्णविराम लागेल.
असो, भारताला कॅचेस विन मॅचेस हे सूत्र पुन्हा एकदा शिकावे लागेल. ही मालिका जिंकली, पण त्याने प्रश्न सुटण्याऐवजी निर्माण झाले आहेत. ज्या प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी महत्त्वाची असते, त्याचप्रकारे क्षेत्ररक्षणही महत्त्वाचे असते हे जर भारतीय संघाला लवकर उमगले तरच भविष्य उज्ज्वल आहे अन्यथा पुढील वाटचाल खडतर ठरेल.