पुणे – करोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) आवारातील व्हर्चुअल क्लासरुम स्टुडिओही वर्षभरापासून धूळखात पडून आहे.
समग्र शिक्षा, एमएससीआयटी आणि व्हॅल्युएबल ग्रुप यांच्या वतीने ऑगस्ट 2019 मध्ये तो उभारला होता. यासाठी मोठा खर्चही झाला होता. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते स्टुडिओचे उद्घाटन झाले होते.
नंदूरबार, गडचिरोली, नाशिक, पालघर या चार आदिवासी जिल्ह्यांतील शैक्षणिकदृष्ट्या मागास विभागातील 36 निवडक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांच्या संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच वेळी व्हावे, यासाठी व्हर्चुअल क्लासरुम स्टुडिओ सुरू केला होता. “व्ही सॅटवर’ आधारित हा स्टुडिओ चालणार असून त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असेही पूर्वीच स्पष्ट केले होते.
शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा स्टुडिओ उभारला. कला, क्रीडा, व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही विद्यार्थ्यांना तज्ज्ञामार्फत उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. कमी वेळेत विद्यार्थ्यांना जास्तीचे शिक्षण देण्यास सुरुवातही झाली होती.
स्टुडिओ परिसरात घाणीचे साम्राज्य
करोनामुळे गेल्या मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याला प्राधान्य देण्यात आले. दरम्यान, व्हर्चुअल क्लासरुम स्टुडिओ सहा महिने व्यवस्थीत कार्यरत ठेवला होता. शाळा बंद झाल्यानंतर मात्र हा स्टुडिओही अडगळीतच पडलेला आहे. भंगार माल या स्टुडिओला लागून पडलेला असल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शाळा बंद असल्यातरी हा स्टुडिओ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कसा वापरात येईल याचा विचार करण्याचा विसरही अधिकाऱ्यांना पडला आहे. व्हर्चुअल क्लासरुमसाठी आवश्यक असणारे संच शाळांमध्येच ठेवण्यात आले होते. शाळा बंद असल्याने संचही बंद आहेत. त्यामुळे व्हर्चुअल क्लासरुमचा स्टुडिओही काही महिने बंदच आहे. काही दिवस दूरदर्शनला शुटींगसाठी तो देण्यात आला होता, अशी माहिती विद्या प्राधिकरणातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.