पुणे – टी. नटराजनने अखेरच्या षटकात केलेली अचूक गोलंदाजी व शार्दुल ठाकूरने मोक्याच्या क्षणी मिळवलेल्या बळींच्या जोरावर यजमान भारताने इंग्लंडचा तिसऱ्या व निर्णायक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा केवळ 7 धावांनी पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यातील विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवत इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाची हॅटट्रिक साकार केली. इंग्लंडच्या या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी व टी-20 पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकत पाहुण्यांना व्हाइटवॉश दिला.
नियमित कर्णधार इयान मॉर्गन या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नसल्याने जोस बटलरकडे संघाची धुरा होती. त्याने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय भारताच्या सलामीवीरांनी अयोग्य ठरवला. सलामीवीर शिखर धवन व हिटमॅन रोहित शर्मा यांनी शतकी सलामी दिली. यावेळी रोहित स्थिरावल्यानंतरही अनावश्यक फटका मारून बाद झाला. धवनने मात्र थाटात अर्धशतक पूर्ण केले. मात्र, कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. अर्धशतकी खेळी झाल्यावर धवनही परतला, तर लोकेश राहुलनेही निराशा केली. त्यानंतर मात्र ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी तुफानी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. धवन, पंत व हार्दिक पांड्या यांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 322 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताने दिलेल्या त्रिशतकी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. भुवनेश्वर कुमारने भरात असलेली जोडी जेसन रॉयला 14 धावांवर, तर संपूर्ण मालिकेत तडफदार फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टोला बाद करत भारताच्या मार्गातील मोठे अडसर दूर केले.
दुसऱ्या सामन्यात वादळी फलंदाजी केलेल्या बेन स्टोक्सलाही या सामन्यात अपयश आले. तो केवळ 35 धावा काढून बाद झाला. बदली कर्णधार जोस बटलरला शार्दुल ठाकूरने बाद केले. पहिले चार प्रमुख फलंदाज तंबूत परतल्यावर लियाम लिव्हिंगस्टोन व डेव्हिड मलान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला दीडशेचा पल्ला पार करून दिला. त्याचवेळी लिव्हिंगस्टोनला 36 धावांवर बाद करत शार्दुल ठाकूरने इंग्लंडला पुन्हा एकदा हादरा दिला. त्यानंतर डेव्हिड मलान अर्धशतक करून बाद झाला. त्यालाही ठाकूरनेच तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मोईन अलीने चांगली खेळी केली. मात्र, विनाकारण आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो देखील बाद झाला.
दुसरा स्पेल टाकत असलेल्या भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्याचा पांड्याने सुरेख झेल घेतला. त्यानंतर सॅम करन व आदिल रशिद यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताची डोकेदुखी वाढवली होती. त्यावेळी पुन्हा एकदा ठाकूरनेच आदिल रशिदला बाद केले. कोहलीने रशिदचा झेल अफलातून सूर मारत पकडला व तिथेच सामना भारताच्या बाजूने फिरला. मात्र, तरीही धोका टळलेला नव्हता कारण सॅम कुरेन खेळपट्टीवर ठिय्या देऊन खेळत होता. त्याने एकदिवसीय कारकिर्दीचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मार्क वूडला साथीला घेत नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. इंग्लंडला दोन षटकांत 19 धावांची गरज होती. 49 व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर भारताच्या ठाकूर व नटराजन यांनी दोन झेल सोडले. अखेरच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज असताना नटराजनने अवघ्या 6 धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅम कुरेनने 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूरने 4, भुवनेश्वर कुमारने 3, तर नटराजनने 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, रोहित व धवन यांनी शतकी सलामी दिली. हे दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना आदिल रशिदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांवर परतला. धवनला रशिदने त्याला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. धवनने 10 चौकारांसह 67 धावा केल्या. भरात आलेला कर्णधार विराट कोहली मोईन अलीच्या गोलंदाजीवर 7 धावांवर बाद झाला. राहुलनेही खूप निराशा केली. त्यालाही मोईन अलीनेच 7 धावांवर बाद केले. मात्र, त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. पंतने अर्धशतक फटकावले. मात्र, अनावश्यक फटका मारून तो सॅम कुरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पंतने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या. पांड्या-पंत या दोघांनी 99 धावांची भागीदारी करत संघाला अडीचशे धावांचा पल्ला गाठून दिला.
पांड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. बेन स्टोक्सने त्याला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. पांड्याने 5 चौकार व 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने 3 षटकार व एका चौकारासह 30 धावांची खेळी केली. शार्दुलसह कृणाल पांड्यानेही 25 धावांचे योगदान दिले. मार्क वूडने या दोघांना बाद केले. त्यानंतर भारताचे शेपटाकडचे फलंदाज जास्त तग धरू शकले नाहीत. रीस टोपलीने भुवनेश्वर कुमारला बाद करत भारताचा डाव 48.2 षटकांत 329 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 3 बळी घेतले. भारतीय फलंदाज पूर्ण षटकेही खेळू शकले नाहीत.
सॅम कुरेनने दिला लढा
एका बाजूने प्रमुख फलंदाज अपयशी होत असताना तळात फलंदाजी करत असलेल्या सॅम कुरेनने जिद्दी फलंदाजी करत भारताच्या गोटात चिंता निर्माण केली होती. त्याने 95 धावांची अविश्वसनीय खेळी केली. मात्र, संघाचा विजय साकार करण्यात त्याला अपयश आले. सामन्याचे पारडे सातत्याने दोन्ही संघांकडे झुकत होते. अखेरच्या षटकात तर सामन्याची रंगत वाढली. इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने कोहलीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. या षटकात केवळ 6 धावा देत भारतीय संघाचा विजय साकार केला. अफलातून खेळी करणारा कुरेन सामन्याचा तर, मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो मालिकेचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 48.2 षटकांत सर्वबाद 329 धावा. (ऋषभ पंत 78, हार्दिक पांड्या 64, शिखर धवन 67, रोहित शर्मा 37, शार्दुल ठाकूर 30, कृणाल पांड्या 25, मार्क वूड 3-34, आदिल रशिद 2-81). इंग्लंड – 50 षटकांत 9 बाद 322 धावा. (मोईन अली 29, बेन स्टोक्स 35, लियाम लिव्हिंगस्टोन 36, डेव्हिड मलान 50, सॅम कुरेन नाबाद 95, रिस टोपली नाबाद 1, शार्दुल ठाकूर 4-67, भुवनेश्वर कुमार 3-43, टी. नटराजन 1-73).