पुणे – राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी उजनी जलाशय प्रसिद्ध आहे. जलाशयाच्या बॅकवॉटरवर इंदापूर, पळसदेव, भिगवण, दौंड, तसेच करमाळा, कर्जत तालुक्यांत मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. गोड्या पाण्यात आढळणारे मासे विशेषत: चिलापी मासा “भिगवण मच्छी’ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे; परंतु आता उजनी भरलेले असतानाही प्रदूषणामुळे जलाशयात पाण्यात मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.
पुणे परिसरातील सांडपाणी, तसेच औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता मुळा-मुठा नदीद्वारे थेट उजनीत येत आहे. पाण्यावर दुर्गंधीयुक्त रसायनांचा तवंग येऊन जलचरांसाठी हे पाणी विषारी बनले आहे. यातूनच उजनीतील विविध माशांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
रोहू, कटला, सायप्रानीस, मृगळ अशा प्रमुख कार्प जाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून खदरा, तांबेरा, घोगरा, वाम, मरळ, भाती, आमळी, शेंगळ, शिवडा, चालट, मुनिया, टाकर, आहेर, कानस, कोळीस अशा जाती नष्ट झाल्या आहेत. दूषित पाण्यात तग धरू शकणारा चिलापी हा एकमेव मासा उजनीत सापडत आहे.
मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरले असता दूषित पाण्यामुळे शरीराला खाज सुटते. त्वचेचे अन्य आजारही जडत आहेत. यातून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
उजनी जलाशयाचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात नसल्याची खंत मच्छिमार, तसेच जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका, नगरपरिषद प्रशासनासह औद्योगिक वसाहतींवर दूषित पाण्याबाबत कडक निर्बंध, नियम लावणे गरजेचे ठरत आहे.
“प्लवंग’च्या कमी प्रमाणामुळे मासेमारीवर परिणाम
भीमा नदीतून अनेक शहरांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. आरोग्यास हे पाणी हानिकारक असून नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी वापरणे गरजेचे आहे, त्याच भीमा नदीच्या गोड्या पाण्यात असलेल्या प्लवंगचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदीतील पाण्याला हिरवा रंग आलेला आहे. प्लवंग हे माशांचे सूक्ष्म अन्न असून त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे माशांची वाढ खुंटली आहे, त्याचाच परिणाम मासेमारीवर होत आहे.
उजनीतील मासेमारी संपुष्टात येण्यास प्रदूषण जेवढे जबाबदार आहे तेवढीच बेकायदेशीर मासेमारी आणि सत्तेवर असणारे प्रत्येक सरकार जबाबदार आहे. मासेमारीचा प्रश्न सरकारी लाल फितीत अडकून पडला आहे. नैसर्गिक प्रजनन होणाऱ्या अधिक जाती नामशेष झाल्या आहेत. कोणतेही सरकार असो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याची भाषा करते. वास्तविक, उजनीकाठी उपलब्ध असणारा रोजगार हिरवला आहे.
– भरत मल्लाव, उजनी अभ्यासक
मानवनिर्मित प्रदूषणामुळे भीमेचे पाणी अत्यंत विषारी बनले आहे. अनेक शहरांना भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. आरोग्यास हे पाणी हानिकारक असून, नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी वापरणे गरजेचे आहे. दूषित पाण्यामुळे अनेक जलीय परिसंस्थांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय नदी पात्रात उपजीविका करणाऱ्या पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे.
– डॉ. अरविंद कुंभार, पर्यावण अभ्यासक