श्रीनगर, दि.25 -जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची गुरूवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉण्डरिंग प्रकरणी पाच तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर देशातील सत्ताधाऱ्यांना विरोध आता गुन्हा मानला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
मेहबुबा यांना चौकशीसाठी सोमवारी ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देऊन त्या हजर राहिल्या नाहीत. दिल्लीऐवजी श्रीनगरमध्ये चौकशी करण्याची त्यांची विनंती मान्य करण्यात आली. त्यानुसार, ईडीच्या येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मेहबुबा यांनी मोदी सरकारवर शाब्दिक तोफ डागली. राज्यघटनेच्या आधारे नव्हे; तर एका राजकीय पक्षाच्या अजेंड्यानुसार देश चालवला जात आहे. देशातील सत्ताधाऱ्यांना विरोध केल्यास देशद्रोह किंवा मनी लॉण्डरिंगचे आरोप ठेवले जातात. विरोधकांना शांत करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि एनआयए सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पासपोर्ट नूतनीकरणाला पोलिसांचा विरोध
मेहबुबा यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी उच्च न्यायालयात विरोध दर्शवला. गुन्हे अन्वेषण खात्याने (सीआयडी) मेहबुबा यांच्या विरोधात प्रतिकूल अहवाल दिल्याचे कारण पोलिसांकडून देण्यात आले. मात्र, त्याविषयीचा अधिक तपशील पोलिसांकडून सांगण्यात आला नाही.