नाशिक – लग्नाला गेलेल्या दोन सख्या भावांचा विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (ता. 24) दुपारी तीनच्या सुमारास घडली. दोन तरूण मुलांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आई-वडिलांवर आली. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळला आहे. रात्री उशीरा दोघांवर अजंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजंग येथील इंदिरानगर परिसरातील देवीदास जाधव यांची मुले हर्षल (वय 22) व रितेश (वय18) हे बुधवारी निमशेवाडी येथे मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न पार पडताच तेथून जवळच असलेल्या विराणे येथील धरणाजवळ दोघे भाऊ गेले. त्यावेळी रितेशचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी भाऊ हर्षलनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
परिसरातील नागिरीकांना घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धरणाकडे धाव घेऊन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई-वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले –
हर्षल नाशिकला एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर रितेश मालेगाव येथे बारावीत होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलं कष्टातून उभा केलेला संसार फुलवतील, असे सोनेरी स्वप्न उराशी बाळगलेल्या आई-लडिलांचा टाहो काळीज हेलावणारा होता. दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही कर्ती मुले गमावल्याने जाधव कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. आई वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले.