मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक, मनसूक हिरेन हत्या प्रकरण आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने राज्याचे राजकारण तापले होते. यापैकी मनसूख हिरेन हत्या प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आलं होतं. तरी डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे यांनी एनआयए तपास संस्थेच्या आधीच मनसूख हिरेन प्रकरणाचा छडा लावला. मात्र आता या प्रकरणातील सर्व कागदपत्र एनआयएकडे सोपविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे एनआयए कडे द्या, असे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तुमचा तपास तात्काळ थांबवा आणि हत्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवा, असं आदेशात स्पष्ट म्हटलं आहे.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढली आहे. तरीही एटीएस तपास सुरू ठेवून आरोपींची कोठडीही मिळवत आहे. त्यांचा तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा, अशी एनआयएने विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे हा एटीएस आणि राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.