शेरखान शेख
शिक्रापूर -निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नागरिकांना अनेक आश्वासने दिली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे अनेक व्हिडिओ सध्या मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण दिलेल्या आश्वासनांबाबत बोला? असे म्हणत या व्हिडिओंची चर्चा ग्रामीण भागात चांगलीच रंगली आहे.
विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार हे भर पावसात उभे राहिले अन् त्यावेळची सभा चांगलीच गाजली. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी तेलंगणा राज्य चोवीस तास मोफत वीज देते मग हे सरकार का देत नाही? असे म्हणत अडचणीच्या काळात वीज तोडू नका असे म्हटले होते.
तसेच त्यावेळी सत्तेत नसल्याने आता आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यांत सातबारा कोरा केला जाईल तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांना सौरपंप दिले जातील. आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणा तुमचे सर्व प्रश्न सोडवू असे नाही केले तर मी तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेदरम्यान म्हटले होते.
तर शरद पवार यांनी सरकारचे कोणतेही देणे आम्ही देणार नाही. कोणत्याही प्रकारच्या सोसायटीचे देणे देणार, विजेचे बिल देणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्टवादीचे अनेक आमदार निवडून आले तसेच काही घडामोडीनंतर सरकार स्थापन झाले.
राष्ट्रवादीदेखील सत्तेत बसली. मात्र सध्या सर्वत्र करोनाचे सावट आहे. जतना मोठ्या संकटात सापडलेली असताना जनतेला आश्वासन देणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच अजित पवार सत्तेत असताना सध्या वीज बिलांचा तगादा तसेच वीजपुरवठा खंडित, कर्जमाफी होत नाही.
त्यामुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागातील नागरिकांनी सोशल मीडियावर जुन्या व्हिडिओंची नुसती खैरात केली आहे. त्यामुळे नेत्यांनी दिलेली आश्वासने ही आश्वासनेच राहतात कि नेते त्यांच्या दिलेल्या शब्दाला जागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.