कमी शिक्षण असूनही मोठे कुटुंब सांभाळण्याच्या कला आजींकडे होती. हल्लीच्या मुलींना घर सांभाळणे कठीण जाते पण अनेक लोकांना सांभाळूण घर उभे करण्याचे व घरातील एकोपा टिकवून ठेवण्याचे कसब तिच्याकडे होते. सर्वांना सांभाळून घेण्याचे बाळकडू मिळाले होते. माझ्या वडिलांच्या आईला सर्वजण ताई म्हणत म्हणून आम्ही नातवंडेही तिला ताईच म्हणत असू. आम्ही जसे लहानाचे मोठे होत गेलो तसे तिला पाहत होतो. कायम शांत असायची आणि ती कुठल्यातरी कामात सतत व्यस्त असायची. कोणासाठी घरातील सर्व छोटी मोठी कामे ती सफाईने करत होती. तिचे आयुष्य खूपच दुःखात गेले. सख्खे भावंड हे तर गेले होते पण स्वतःची मुलगी बालविधवा होऊन घरी होती. तरीही ती कधी डगमगली नाही.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. हल्ली सारखे लग्न झाले की वेगळे राहाणे अशी पद्धत त्यावेळेस नव्हती. मुलांचे शिक्षण व लग्न झाल्यावर देखील प्रत्येक मुलाला व सुनेला तिने तिची घरातील जबाबदारी वाटून दिली होती. त्यामुळे घरामध्ये कोणाचीही कुरबर होत नसे. काही अडचणी निर्माण झाल्या तरी ती स्वतः उभे राहत असे. सकाळीची सर्व कामे, चहा नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व कामात तिची मदत असे. आमच्याकडे कायम तिच्यासाठी व लहान मुलांसाठी कमी तिखटमीठाचा स्वयंपाक व्हायचा किंवा तिचा स्वयंपाक वेगळा व्हायचा. कुठलाही सणवार असो सर्व फराळाचे बनवण्यास स्वतःहून हिरीरीने सहभाग घ्यायची. जशी दुधापेक्षा साईला जास्त जपतात तशी ती प्रत्येक नातवाचा विचार करून घरातील बाळगोळापांसाठी कमी तिखटाचा फराळ करायची. ती कायम पांढऱ्या घोंगडीवर त्यावर जुन्या साड्या एकत्र टाकून शिवलेले गादी वजा अंथरूणावर झोपत असे. डोक्याला जुन्या पातळ्याच्या घड्या, ही तिची उशी. तिच्या अंथरुणाला आम्ही कोणीही हात लावत नसू. त्यावर बसतही नसू, दुपारी फक्त ती पांढऱ्या घोंगडीवर डोक्याखाली छोटा लाकडी पाट घेऊन झोपत असे. तिची पूर्ण घरावर, घरातील प्रत्येक सदस्यावर, स्वयंपाक घरावर एक प्रकारचा वचक होता. सर्वांना तिची आदरयुक्त भीती असे.
मंदिराला लागूनच आमचे घर असल्याने ती काही वेळेला कीर्तन ऐकायला देवळाच्या ओट्यावर बसलेली असे. बऱ्याच वेळेला हिवाळ्यामध्ये दुपारी तिचे वास्तव्य देवळातल्या मोकळ्या जागेमध्ये, सूर्याचे किरण घेण्यासाठी ती बसलेली असे. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक ओळखीच्या माणसांशी तिचा वार्तालाप होई. देवळात येणाऱ्या दिंडीचे लोक आणि त्यांच्या बायका त्यांच्याशी तिने साधलेला संवाद हा आमचा एक मनोरंजनाचा भाग होता. कारण ती मराठवाडी भाषेमध्ये संवाद साधत असे. पण तिच्या बोलण्यामध्ये बरेचसे उर्दू शब्दही येत असे. जसे की मुलाहिजा, कलम, बेशुमार, हादसा, फिक्र असे शब्द बोलण्यातून कधी कधी येत असत. देवळातले कीर्तन प्रवचन हेच एक तिचे मनोरंजनाचे साधन होते. रविवारचा दिवस घरातील आम्हा सर्व नातींसाठी नाहण्याचा कार्यक्रम असायचा. विविध प्रकारच्या आयुर्वेदिक घटक पदार्थ टाकून उकळून ठेवत असे. आंघोळीनंतर मग दुपारी तिच्यासमोर बसावं. वेगवेगळ्या हेअर स्टाइल शिकून घ्याव्या हा आमचा रविवारचा दिवस असे. आमच्या सगळ्या बहिणींच्या लांब केसांवर हात फिरवून मायेने म्हणायची, “आता केस कापू नका बरं!’ पण कधीतरी इंचभर कापलेल्या केसांची वेणी तिच्या नजरेतून सुटत नसे. त्यावर ती काही बोलत नसे.
आम्हा सगळ्या बहिणींचे लग्न झाले. तिला नातसुनाही आल्या. पण तरीही तिचा उत्साह पूर्वीसारखाच होता. तिला वेगवेगळ्या रंगांच्या काचेच्या बांगड्या घालायला फार आवडे. आम्ही माहेरी आल्यावर शकुनाच्या चार बांगड्या भरण्यासाठी पैसे देई; पण सासरी जाताना तिच्या जीवाची तगमग व्हायची. थकलेले डोळे खूप काही सांगून जात असत. खणा नारळाची ओटी भरून झाल्यानंतर वरचेवर येत जा, खुशाली कळवत जा, थरथरत्या हाताने आशीर्वाद देऊन पाठवणी करायची.
मंगळागौरीला ठेवणीतील साडी काढून उत्सुकतेने आमचे सर्व लाड ती न्याहाळत असे व रात्रीचे जागरण करताना आमच्या बरोबरीने खेळ व गाणे म्हणायला ती सदैव तयार असायची; पण कालांतराने ती थकत चालली होती. मंगळागौरीचे, भोंडल्याचे, बारशाचे, डोहाळ जेवणाचे, लग्नातल्या हळदीचे, नाग पंचमीचे विविध प्रकारच्या सणांचे गाणे म्हणताना यमक आणि ताल ऐकणाऱ्याला तिच्या प्रगल्भतेचे जाणीव होत असे. कालांतराने तिची दोन मुले गेल्याने ती खरोखरच खचली होती. तब्येत साथ देत नव्हती; पण तरीही ती विधवा सुनांच्या पाठीमागे खंबीर उभी राहिली. तिने आईला आणि काकूला जसे पूर्वी राहात होत्या तशाच राहा, असे म्हणत असे. तिच्या स्वतःच्या कामांना दुसऱ्यांना हात लावू देत नसे. कधीही अंथरुणाला खिळून राहिली नाही ना कधी आजारी म्हणून झोपून राहिली. वयाच्या 99 व्या वर्षी अल्पशा आजाराने ती निवर्तली. नियतीच्या पुढे आम्ही हातच जोडले. आजही तिच्या आठवणींचा बांध एखाद्या धबधब्यासारखा वाहतो.
ज्योत्स्ना पाथ्रीकर