आपले सगळे बरोबर आहे ना? बाकीच्यांना आपण कसे वाटतो? त्यांचे आपल्याबद्दल मत काय आहे? मी इतरांसारखीच आहे ना? की काही वेगळे आहे माझ्यात? लोकांना पसंत न पडण्यासारखे? आपल्या भोवतालचे लोक किती आत्मविश्वासानं वावरतात! त्यांचे कसे सगळे छान, सुरळीत चाललेले असते? आपल्याला का नाही जमत तसे? असे काही विचार आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात केव्हा ना केव्हा तरी येऊन गेलेले असतात. अशाच एका रिया नावाच्या मुलीची कथा “मॅंगो मलई’ या शॉर्ट फिल्ममध्ये सांगितली आहे.
रिया चांगली हुशार. अभ्यास, संशोधक, आपले काम यात रमलेली. पण सध्या थोडी उदास झालेली. श्वेता सुरीशेट्टी हिने चेहऱ्यावरून, राहणीवरून रियाची व्यक्तिरेखा उत्तम उभी केली आहे. इतर काही मुलींसारखं नट्टापट्टा करणं, छान राहणं, हेअरस्टाइल वगैरे… यामधे रियाला फारसा रस नसतो आणि त्यामुळे की काय, ती मित्रमैत्रिणींपासून अलीकडे काहीशी दुरावलेली आहे. त्यामुळे ती आणखीच एकटी पडलेली आहे. आपलेच काही चुकते आहे का? आपले बाहेरचे जग इतके सीमित का झाले आहे? अशा विचारात ती असते. त्यातच तिच्या आईला तिच्या लग्नाची घाई झालेली. ती आपली सारखी वेगवेगळ्या लग्नाळू मुलांना घरी बोलावून त्यांची माहिती घेत असते.
शेवटी रिया वैतागून म्हणते, “तू जेव्हा असे मुलांना बोलावतेस, तेव्हा मला विचारत जा आधी. सांगत तरी जा.’ आईपण चिडते. म्हणते, “हे माझं घर आहे. इथे मीच ठरवणार कोणाला बोलवायचं ते.’ रिया म्हणते, “हो ना? मग माझंपण ऐक. हे माझं आयुष्य आहे. लग्न कधी करायचं, करायचं की नाही हे मी ठरवेन.’ आई रागावून म्हणते, “आता तिशीला आलीस तू. कधी करणारेस लग्न? म्हातारी व्हायची वाट पाहते आहेस का?’ तिथे बसून रियाचा धाकटा भाऊ कबीर हे सगळं ऐकत असतो. “म्हातारी?’ असं म्हणून तो हळूच हसतो.
रिया वैतागून तिच्या खोलीत जाऊन वाचत बसते. तिच्या आवडीचे काम कॉम्प्युटरवर करू लागते. थोड्या वेळानं हळूच कबीर तिथे डोकावतो आणि हसून म्हणतो, “वातावरण गरम असेल तर थोडं गार करू का?’ रिया रागावलेलीच. म्हणते, “काही नको.’ पण तो आत येतो. तिला खुलवतो. गप्पा मारतो. या प्रेमळ भावाची भूमिका आशुतोष वालिया याने केली आहे. बहिणीसाठी तिचं आवडतं आंबा आइस्क्रिम त्यानं आणलेलं असतं. ती पटकन त्याच्या हातातून घेऊन खाऊ लागते तर तो खोडकरपणे म्हणतो, “ते माझ्यासाठी आणलंय. तू का खातेस?’ रिया म्हणते, “मला आवडतं म्हणून…’
मग कबीर तिला म्हणतो, “असंच तुला जे आवडतं ते तू हक्कानं करत जा. हल्ली तुझे मित्रमैत्रिणी दिसत नाहीत जास्त.’ एका मित्रावरून तो तिला चिडवतो. ती म्हणते, “मी बहुतेक आवडत नाही… कुणालाच…!’
“का?’ “माझ्यात नसेल काही आवडण्यासारखं.’ रिया म्हणते. मग कबीर तिच्यात चांगल्या असलेल्या अनेक गोष्टी तिला सांगतो. “तू हुशार आहेस. नेहमी टॉपर होतीस.’ “उपयोग काय? माझ्याशी कुणालाही मैत्री करावी वाटत नाहीय’ ती खिन्नपणे म्हणते.
“हे तू कशावरून म्हणतेस? तू जर त्यांना वारंवार भेटलीस, त्यांच्याशी गप्पा मारल्यास, त्यांच्या गप्पा ऐकल्यास तर तुमची मैत्री चांगली पक्की होईल. मी बघितलंय ना… सगळे तुला मानतात.’ तो तिला तिच्या खोलीतून बाहेर घेऊन येतो. दोघेही बाल्कनीत मोकळ्या हवेत उभे राहतात. ती आकाशाकडे बघत राहते. कबीर म्हणतो, “तुझी नजर नेहमी वर ताऱ्याकडे असते. तू महत्त्वाकांक्षी आहेस. तू ठरवलंस तर खूप काही गोष्टी तू मिळवू शकतेस. मग मैत्री तर काय… सहज करू शकशील कुणाशीही.’
ती हळूहळू निराशा विसरते. चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागतो. हसून म्हणते, “मॅंगो आइस्क्रिम मात्र छान होतं हं… थॅंक्स!’
कबीर तिला म्हणतो, “तुला तर सगळे स्कॉलर समजतात. माझंसुद्धा तू रोल मॉडेल आहेस. मला तुझ्यासारखं बनायचंय. मी जर तुझ्याइतका हुशार, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असतो तर माझं आयुष्य किती सुखाचं झालं असतं…’ हा तिची खुशामत करत राहतो. “पण माझे विचार कुणालाच पटत नाहीत.’ ती आईवरच्या नाराजीनं म्हणते.
“पटतील. आधी तुला तुझे विचार बरोबर आहेत असं पूर्णपणे पटू दे. मग बघ. सगळ्यांना पटतील तुझे विचार. आणि मग…’ “मग काय?’ ती हसून विचारते. “मग काय… तू लग्नही करशील तुझ्या आवडत्या माणसाशी.’ तो मिश्किलपणे म्हणतो. ती हसायला लागते. त्यावर तो तिला म्हणतो, “चल, पैसे दे मला आइस्क्रिमचे. तूच खाल्लंस सगळं. आणि शिवाय तुझा मूडही चांगला केला मी. आता मला आइस्क्रिमचे पैसे हवेत.’ ही त्याच्या पाठीत धपाटा घालते. दोघे हसत असतानाच फिल्म संपते. प्रसन्न वातावरणात.
माधुरी तळवलकर