नवी दिल्ली – देशात करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. आज देशात एका दिवसात यावर्षातील सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 26 हजार 291 नवीन कोरनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यातच या महासाथीमुळे 118 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 25 हजार 320 करोनाबाधितांची नोंद झाली होती. तर देशात आतापर्यंत 2 कोटी 99 लाखाहून अधिक लोकांनी करोनाची लस घेतली आहे.
आतापर्यंत 1 लाख 58 हजार 725 जणांचा करोनामुळे मृत्यू –
आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात करोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 कोटी 13 लाख 85 हजार 339 वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत 58 हजार 725 करोनाबाधित रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रूग्णांची संख्या वाढून 2 लाख 19 हजार 262 झाली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 7 हजार 352 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत 22 कोटी 74 लाख 7 हजार 413 जणांची तपासणी –
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (ICMR) ट्विट करून सांगितले आहे की, देशात कालपर्यंत 22 कोटी 74 लाख 7 हजार 413 जणांची करोनाची तपासणी करण्यात आली आहे. तर काल 7 लाख 3 हजार 772 नमुऩ्यांची काल तपासणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन –
महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश मध्ये करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक असून येथे गेल्या 24 तासात तब्बल 16620 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या राज्यांना जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नीति आयोगाचे सदस्य वी.के. पाॅल यांनी गेल्या हप्त्यात सांगितले होते की, महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक आहे.