नवी दिल्ली – ऍस्ट्राझेन्का करोना लासीच्या वापरानंतर होत असलेल्या साईड इफेक्टचा सखोल आढावा भारत घेत आहे. काही जणांच्या रक्तात गाठी होत असल्याचे आढळल्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, आइसलंड आणि थायलंड या देशांनी त्यांच्या देशातील या लसींचा वापर तात्पुरता थांबवला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.
आम्ही सर्वच विपरित परिणामांचा आणि विशेषत: मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल करावी लागलेली प्रकरणे आम्ही तपासणार आहोत. जर त्यात काही काळजी करण्यासारखे आढळले तर आम्ही माघार घेऊ, असे करोनावरील राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य एन. के. आरोरा यांनी सांगितले.
ते म्हणाले, भारतात तरी काळजी कराव्या एवढ्या संख्येने विपरीत परिणाम घडल्याच्या घटना घडल्या नाहीत. जर रक्तात गुठळ्या होण्यासारख्या काही घटना घडल्या तर आम्ही फेरविचार करू. कालपर्यंत मृत्यूच्या 59 ते 60 घटना घडल्या आणि ते सर्व योगायोगाचे होते. रुग्णालयात दाखल करावे लागलेल्यांची फेर तपासणी करण्यात येईल.
लसीकरणाच्या 56 व्या दिवशी म्हणजे 12 मार्चला 20 लाख 53 हजार 537 डोस देण्यात आले. तो आजवरचा एका दिवसातील सर्वात उच्चांक आहे. एकत्रितपणे आतापर्यंत दोन कोटी 82 लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.