मिरियानी – कॉंग्रेस हा देशातला सर्वात भ्रष्ट पक्ष असून या पक्षाला मतदारांनी अजिबात समर्थन देऊ नये असे आवाहन भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी आज आसामातील प्रचार सभेत बोलताना केले. त्या म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करून आसामात विकासाची गंगा आणखी वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षालाच विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या आसामातील पहिल्याच जाहींर सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस सारखा दुसरा कोणताही भ्रष्ट पक्ष या देशात नाही. या पक्षाला ईशान्य भारतात या आधी काहीही करता आलेले नाही. सन 2014 साली मोदी सत्तेवर आल्यानंतरच ईशान्य भारताच्या विकासाला चालना मिळाली असे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसने केवळ गरीबांच्या नावाने मते मिळवली पण त्यांच्या हिताचे कधीच काम केले नाही असा आरोपही त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाने गरीबांसाठी अविश्रांत मेहनत केली आहे असेही त्यांनी नमूद केले. मनमोहनसिंग यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या की आसामातून अशा काही नेत्यांना संसदेत पाठवले गेले आहे की, हे नेते पंतप्रधानही झाले. पण आसामात एम्स सारखे रूग्णालय सुरू होण्यासाठी मोदी पंतप्रधान होई पर्यंत प्रतिक्षा करावी लागली.